Vedanta Foxconn : "महाराष्ट्राला सीरियस मुख्यमंत्र्यांची गरज आहे. वेळ पडली तर दोन मुख्यमंत्री नेमा," असा उपहासात्मक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला आहे. तसंच "फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेऊन महाराष्ट्राचं आणि मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे," अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली. वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावरुन सरकारवर निशाणा साधला.


'सरकारने दोन मुख्यमंत्री नेमावे, एकाने जरुर यात्रेवर जावं आणि एकाने राज्य चालवावं'
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी सगळ्या मंडळांमध्ये जावं, सगळं साजरं करावं. म्हणून मी सातत्याने म्हणते की महाराष्ट्राला सीरियस, फोकस्ड मुख्यमंत्र्याची गरज आहे. वेळ पडली तर या सरकारने दोन मुख्यमंत्री नेमावे, एकाने जरुर यात्रेवर जावं आणि एकाने राज्य चालवावं, म्हणजे आता जे महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे ते होणार नाही. कारण हे महाराष्ट्राला परवडणारं नाही." "या प्रकल्पामुळे लाखो नोकऱ्या मिळणार होत्या, असं काय घडलं की आपल्या हातातील घास काढून घेण्यात आला?" असा सवालही त्यांनी विचारला.


'महाराष्ट्राच्या विरोधात केंद्र सरकारचा कट'
"फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेऊन महाराष्ट्र, मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा काम सुरु आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या विरोधात हा कट करत आहे," असा आरोप सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.


'शिंदे गटाचे सगळे निर्णय दिल्लीतून होतात'
शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "छत्रपतींचं नाव घेऊन हे सरकार सत्तेत आलं. पण छत्रपती कधी दिल्लीसमोर झुकले नाहीत. हे सरकार सातत्याने दिल्ली म्हणेल तेच करतं. दुर्दैवाची गोष्टी ही आहे जी शिवसेना, ज्याकडे भाजप यायचा, आता शिंदे गटाचे सगळे निर्णय दिल्लीतून होतात. काहीतरी नवी कल्चर महाराष्ट्रात येतंय. हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे आणि आपल्या इकॉनॉमीसाठी हानिकारक आहे."


VIDEO : Supriya Sule On Foxconn : महाराष्ट्राला सीरियस मुख्यमंत्र्याची गरज, गरज पडल्यास 2 मुख्यमंत्री नेमा



संबंधित बातम्या


Semiconductor : वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पसाठी 'मविआ'चे मोठे प्रयत्न; या सवलती देण्याचा घेतलेला निर्णय