Maharashtra NCP Political Crisis: उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांची बुधवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तिघांमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा झाली. नेमकी काय चर्चा झालीए हे अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नाही. मात्र अर्थ मंत्रालयासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. शिवाय शपथविधी होऊन 11 दिवस उलटले तरी खातेवाटप न झाल्याचीही चर्चा झाली. तसेच, राष्ट्रवादीच्या कायदेशीर लढाई लढण्याबाबतही अजित पवारांनी अमित शाहांशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. 


अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि भाजपच्या साथीनं सत्तेत सामील झाले. मात्र त्यांनी शरद पवारांची साथ सोडली. एवढंच नाहीतर अजित पवारांनी थेट पक्षावर दावा करत, पक्षाचा अध्यक्ष आपणच असल्याचं सांगितलं. आता राष्ट्रवादी कोणाची? हा प्रश्न कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. याबाबतच अजित पवारांनी कालच्या दिल्ली भेटीत अमित शहांची भेट घेऊन चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कायदेशीर लढाई शरद पवारांकडून हरिष साळवे लढण्याची शक्यता आहे. तर, शरद पवार गटाकडून मनु सिंघवी प्रकरण हाताळणार असल्याची माहिती मिळत आहे. 


खातेवाटपाचा तिढा सुटला? 


खातेवाटपावरुन सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. अशातच आता मात्र खातेवाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि अमित शाह यांच्यात काल (बुधवारी) दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप हायकमांड मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार गटाकडून खाते वाटपाबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर जवळपास तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे. तसेच, अजित पवारांच्या 90 टक्के मागण्यांवर एकमत झालं असून तिनही पक्षांच्या सहमतीनं अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तिनही पक्षांमध्ये सहमती झाल्यास मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे. 


अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले... 


विधान परिषदेच्या 12 आमदारांमध्ये आमचाही वाटा असणार आहे. सरकारमध्ये सहभागी झालो, त्यामुळे आमचाही वाटा असणार आहे. केंद्राविषयी अद्याप कुठलीही चर्चा नाही. 18 तारखेला होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत निमंत्रण देण्यात आलं आहे, याच बैठकीत पंतप्रधान मोदींशीही भेट होणार आहे. तसेच, मंत्रिमंडळ आणि खातेवाटपावर चर्चा झालेली नाही, असं अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. 


मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता


शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता पावसाळी अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता आहे. खातेवाटप लवकरच होणार असल्याची माहिती सुत्रांच्या वतीनं मिळत आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या आठ मंत्र्यांच्या शपथविधी होऊन आठवड्याहून अधिक काळ लोटला, तरी अद्याप त्यांचा खातेवाटप झालेला नाही. आता हा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतरच होईल, अशी माहिती मिळत आहे. 


दरम्यान, राज्यातील आमदारांमध्ये एकप्रकारे अनिश्चितता आहे. सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे गटाच्या आमदारांची बैठक होणार आहे. तसेच शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचीही बैठक होणार आहे. शिवाय शिंदे-फडणवीसांना आज दिल्लीत बोलावण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


खातेवाटपाचा तिढा सुटला? अर्थ खातं राष्ट्रवादीकडेच, अजित पवारांच्या 90 टक्के मागण्यांवर एकमत; सूत्रांची माहिती