Nashik NCP Protest : देशातील 135 कोटी नागरीकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने (Central Government) देशात आणि महाराष्ट्रात (Maharashtra) फसवा विकास केला आहे. हा फसवा विकास म्हणजेच एप्रिल फुल असल्याचे सांगत नाशिक शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी भवन येथे केक कापून अनोखे आंदोलन करण्यात आले. 


केंद्र सरकारच्या वतीने विकासाच्या आणि रोजगाराच्या केलेल्या घोषणा म्हणजे निव्वळ जनतेला एप्रिल फुल आहे अशी घोषणाबाजी करत आज नाशिक (Nashik) शहर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे व युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृवाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या विकास आणि रोजगाराच्या घोषणा म्हणजे निव्वळ एप्रिल फुल (April Full) अशी टीका युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली. यावेळी मोदी सरकार रोजगार कधी मिळणार अशा आशय असलेला केक कापण्यात आला. सहभागी आंदोलकांनी (Protest) काळ्या फित बांधून निषेध व्यक्त केला.


राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज 1 एप्रिलचे औचित्य साधत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करत १ एप्रिल निमित्त फसव्या विकासाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विकासाच काय झालं? एप्रिल फुल, रोजगाराच काय झालं? एप्रिल फुल, दोन कोटी नोकऱ्यांच काय झालं? एप्रिल फुल अशी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केवळ आश्वासन देण्यात आले असून प्रत्यक्षात मात्र तरुणांना रोजगार मिळाला नाही. महागाईने जनता चांगलीच त्रस्त झाली. शासनाची धोरणे देखील अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे आम्ही शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन छेडले, असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली. 


नोकरी, विकासाचं काय झालं?


नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यावेळी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या आधीपासून देशातील जनतेला आश्वासित केले होते. अनेक विकासाच्या योजना, गोरगरिबांना विविध योजना, विकासाचे नवीन मॉडेल असा सगळ्या गोष्टी राबविण्याचे उद्दिष्ट होते, मात्र हे उद्दिष्ट बासनात गेले असून सामान्य जनतेची फक्त पिळवणूक सुरु आहे. मोदी म्हणाले होते कि, काळा पैसा भारतात आणू मात्र आजचे चित्र वेगळे असून फक्त निवडणुकांपुरत्या घोषणा करण्यात येत आहेत. प्रत्येकाच्या बँक खात्यावर पंधरा लाख रुपये देऊ, परदेशातला काळा पैसा परत आणू, नवीन रोजगार निर्माण करू अशा प्रकारची विविध आश्वासने त्यांनी लोकांना देऊन त्यांची दिशाभूल नंतरच्या काळात केल्याचे स्पष्ट झाले आहे .