Maharashtra Monsoon Session Updates: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात (Maharashtra Monsoon Session) वातावरण चांगलंच तापलं आहे. आज विधानसभेत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. विषय होता आदिवासी विभागाशी संबंधित.  राज्यात कुपोषणामुळे एकही बालक मृत्यूमुखी पडलेले नाही. इतर आजारांनी बालक मृत्यू पडल्याचं आदिवासी मंत्री विजयकुमार गावीत यांनी विधानसभेत सांगितलं. यावरुन विधानसभेत जोरदार राडाच सुरु झाला. कुपोषणाच्या मुद्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या उत्तराने आम्ही समाधानी नसल्याने आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून सभात्याग करत असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले आणि सर्व आमदारांनी सभात्याग केला.


अशी पडली वादाची ठिणगी
आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या उत्तरानंतर विरोधकांमधील ज्येष्ठ सदस्यांसह आदित्य ठाकरे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. आदिवासी समाजासाठी आपण काही करू शकलो नाही, याची लाज वाटली पाहिजे असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. त्यावर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आक्षेप घेत असंसदीय शब्द असल्याचे म्हटले. अडीच वर्ष आपण सत्तेत होता, आपल्या पिताश्रींना लाज वाटली असे म्हणायचे का, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. 


आदिवासी विकास मंत्र्यांनी दिलेले उत्तर पटलावरून काढण्याची मागणी


आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एकही बालमृत्यू कुपोषणाने झालेला नसल्याची माहिती सभागृहात दिली. याबाबतची सर्व माहिती हायकोर्टात दिली असल्याचे त्यांनी म्हटले. यावर काँग्रेसचे आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेत मंत्र्यांनी दिलेले उत्तर असंवेदनशील असल्याचे म्हटले. हे उत्तर म्हणजे आदिवासी समाजाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं असल्याचे त्यांनी सांगितले.  आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी आदिवासी विकास मंत्र्यांनी दिलेले उत्तर पटलावरून काढण्याची मागणी केली. त्यावर मंत्री विजयकुमार गावित यांनी वारंवार असंवेदनशील म्हणणे योग्य नसल्याचे सांगितले.ही जबाबदारी सर्व मंत्रिमंडळाची असून फक्त अदिवासी विभागांची नसल्याचे सांगितले. राज्यातील कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री योग्य उत्तर देत नाहीत. ते आरोग्य मंत्र्यांकडे प्रश्न ढकलत आहेत मग आरोग्य मंत्र्यांकडे उत्तर असते तर त्यांनी उत्तर दिले असते मात्र योग्य उत्तर सभागृहात दिले जात नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा अशी मागणीही जयंत पाटील यांनी सभागृहात केली.दरम्यान हा प्रश्न रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लक्षात येताच जयंत पाटील आक्रमक झाले आणि आदिवासी विकास मंत्र्याचा निषेध करत असल्याचे जाहीर केले.


...अन् मुनगंटीवार यांचा पारा चढला


या चर्चेत शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्री महोदय कुपोषणाबाबत चुकीची माहिती देत असल्याचे सांगितले. आदिवासी समाजाची अवस्था पाहिल्यानंतर आपल्याला ही लाज वाटली पाहिजे असं वक्तव्य आदित्य यांनी केले. आदित्य यांच्या या वक्तव्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाले. संसदीय भाषा वापरली पाहिजे असे म्हणताना मुनगंटीवार यांचा पारा चढला. लाज वाटली हा शब्द वापरला नाही पाहिजे. अडीच वर्ष कोण कोण सत्तेत होतं.-आपल्या वडिलांना लाज वाटली का अस म्हणताय का असा सवाल मुनगंटीवार केला. मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ झाला. यावेळी आदित्य यांच्या मदतीसाठी जयंत पाटील धावून आले. आदिवासी मंत्री यांच्या मदतीला वन मंत्री धावले आहेत. मात्र, त्यांनी गैरसमज करु नये असे पाटील यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनीदेखील आदिवासी समाजाची परिस्थिती बघताना राजकारणी म्हणून आपल्याला लाज वाटेल असं म्हणालो असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्षांनी लाज वाटली पाहिजे हा असंसदीय शब्द असल्याचे सांगत  मी तपासून यावर निर्णय घेईल असे म्हटले. 


जयंत पाटील यांनी सदस्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत उत्तर मंत्र्यांनी दिलं पाहिजे म्हणत हा प्रश्न राखून ठेवण्याची मागणी केली.  त्यावर अध्यक्षांनी अल्पकालीन चर्चेत उत्तर घेऊ, असं म्हटलं. यावर असमाधानकारक उत्तर दिलेलं आहे.  त्यामुळे आम्ही सभात्याग करत आहोत, असं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. 


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Assembly Session : आदित्य ठाकरेंचा 'तो' शब्द सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी, मुनगंटीवारांचा पारा चढला


Maharashtra Assembly Session : मंत्रिपद मिळावं म्हणून इम्प्रेस करण्यासाठी माझ्याविरोधात घोषणा : आदित्य ठाकरे