Palghar Fire : पालघर येथील तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत आग लागल्यापासून सलग आठ मोठे स्फोट झाले आहेत. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग लवकर आटोक्यात आणली नाही तर मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली असल्याचे समजते.


 






 


ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने आगीचा धोका
बोईसर येथील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रीमियर इंटरमीडियरी केमिकल कंपनीला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमध्ये गेल्या काही काळात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीही येथील केमिकल प्लांटला भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ताज्या घडामोडीत, मंगळवारी रात्री आणखी एका केमिकल कंपनीला आग लागली. आगीचे स्वरूप गंभीर असून ती आटोक्यात आणण्याचे सर्वात मोठे आव्हान अग्निशमन दलासमोर आहे. स्थानिक पालिका प्रशासन, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीत ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे.


आगीच्या धुरामुळे स्थानिक रहिवाशांना श्वास घेणे कठीण
केमिकल कंपनीला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला आहे. त्यामुळे परिसरातील स्थानिक रहिवाशांना श्वास घेणे कठीण होत आहे. रात्रीच्या अंधारामुळे आग विझवणे अग्निशमन दलाला कठीण जात आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. या आगीमुळे कंपनीत अनेक स्फोट झाले आहेत. भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


आगीचे कारण अद्याप अस्पष्ट


आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून जीवित व वित्तहानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. दोन महिन्यांपूर्वी दुसऱ्या केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत कंपनीच्या प्रोडक्ट मॅनेजरचा मृत्यू झाला होता.