Navratri 2022 : नवरात्रौत्सव (Navratri) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वांनाच आता गरबा-दांडीयाचे (garba in Navratri) वेध लागलेत. गेले 2-3 वर्षे कोरोनामुळे गरब्याच्या मुकलेली तरुणाई यावर्षी गरबा खेळायला मिळेल म्हणून उत्साहात आहे. अशातच नवरात्रौत्सवात यंदा  गरबा रंगला, तरी त्याला वेळेचे बंधन किती असेल? या बाबत सर्वांनाच प्रश्न पडला आहे. या संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. यंदाच्या नवरात्रौत्सवात गरबा-दांडीयाला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत परवानगी द्यावी अशी विनंती करत मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहलंय, काय म्हटलंय त्या पत्रात? जाणून घ्या


मागाठाणे विधानसभेचे आमदार  प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलंय. ज्यात म्हटलंय की...


महोदय,


राज्यात आपले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे सरकार सत्तेवर आले आणि आपण सर्व निर्बंध दूर केल्याने राज्यात तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी उत्सव व गणेशोत्सव तमाम नागरीकांनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला.


सोमवार दिनांक 26 सप्टेंबर ते मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर पर्यंत यंदा नऊ दिवस राज्यात व माझ्या उत्तर मुंबईत ठिकठिकाणी नवरात्रौत्सवात गरबा-दांडीयाचे आयोजन केले आहे. सर्व जाती धर्माचे नागरीक कायद्याचे पालन करत नवरात्रौत्सव उत्साहात साजरा करतात.


गुजरात, राजस्थान व इतर राज्यात जशी नऊ दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत गरबा-दांडीयाला परवानगी दिली जाते, तशीच परवानगी आपल्या महाराष्ट्रात आपण द्यावी, ही नम्र विनंती.


यंदा सर्व निर्बंध मागे


कोरोनाच्या काळात सलग दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. निर्बंध असल्याने सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यावेळी त्यावरील निर्बंध मागे घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील सर्व गणेशोत्सव पदाधिकांऱ्यांची आणि संघटनांची बैठक झाली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदाची नवरात्रोत्सवात गरबा-दांडिया 12 वाजेपर्यंत परवानगी मिळणार का?याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.


शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरूवात


दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील टेंभीनाक्याच्या नवरात्रोत्सवाच्या मंडप पूजनाचा सोहळा संपन्न झाला आहे. यंंदा शारदीय नवरात्रोत्सवाची सुरूवात 26 सप्टेंबर पासून होणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर आता तयारीला सुरूवात झाली आहे.