Loksabha Election 2024 : राज्यात राजकीय उलथा-पालथा झाल्यानंतर पक्षांची संख्या वाढली आहे. मात्र राज्यातील काही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली असल्याची आढळून आले आहे. त्यामुळे राज्यात गेले 5 वर्ष सुरू असलेलं विश्वासघात आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा (Maharashtra Politics) घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीशी काही संबंध आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


त्यामागील कारण असे की, राज्यातील सर्व 48 मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीचा विश्लेषण केल्यावर असे लक्षात आले की, ज्या मतदारसंघात दुभंगलेले किंवा फुटलेले पक्ष निवडणूक लढवत होते त्या मतदारसंघात प्रामुख्याने मतदानाची टक्केवारी घसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघात घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारी मागे आणखी काही करणे आहेत का, तसेच याचा फायदा नेमका कुणाला होणार, या बाबत अधिक माहिती जाणून घेऊया. 


पक्षांची संख्या वाढली, मात्र मतदानाची टक्केवारी घसरली


महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघाच्या संख्येनुसार देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होते. मात्र राज्यातील 48 मतदारसंघात इतर राज्यांच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी तुलनेने कमीच दिसून आली आहे. जर आपण 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तुलना केली, तर राज्यातील 48 मतदारसंघांपैकी 27 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी काहीशी वाढलेली दिसते आहे. तर 21 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी लक्षणीयरीत्या घसरल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे ज्या 21 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे, त्यामध्ये एकतर दुभंगलेले पक्ष समोरासमोर होते किंवा एक पक्ष तरी फुटलेला पक्ष होता.  


राज्यातील 21 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली


शिवसेना पक्षात उभी फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 15 मतदारसंघात निवडणूक लढवली होती. त्यापैकी 8 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे दिसून आले आहे. शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील फुट पडल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 5 मतदारसंघात निवडणूक लढवली. त्यापैकी 4 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे दिसून आले आहे. तर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने 20 मतदारसंघात निवडणूक लढवली. त्यापैकी 10 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरल्याचे पुढे आले आहे.


त्याच प्रमाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 11 मतदारसंघात निवडणूक लढवली, त्यापैकी 4 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे या घसरलेल्या टक्केवारी मागील कारण आणि आगामी काळात त्याचा नेमका कुणाला फायदा होईल, याबाबत राजकीय विश्लेषक वेगवेगळी मते व्यक्त करत आहेत. 


राजकीय विश्लेषकांचे मत काय?  


राजकीय विश्लेषकांच्या मते मतदानाच्या टक्केवारी घसरलेल्या मतदारसंघाचा विश्लेषण केल्यावर स्पष्ट दिसतंय की, राज्यात गेले पाच वर्ष सुरू असलेलं विश्वासघात आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे कुठे तरी मतदारांना राजकारणाचाच वीट आला आहे. राज्यात नवीन पक्ष स्थापन झाल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते नेमके कुठल्या गटात आहेत याची स्पष्टता मतदारांना नव्हती. पक्षांच्या चिन्हाबाबतची अनेक मतदारांना संभ्रम होतं. परिणामी मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. असे मत दैनिक हितवादाचे पत्रकार विकास वैद्य यांनी व्यक्त केले. 


मतदारराजाचा छुपा मात्र बोलका कौलही!


कुठल्याही मतदारसंघात मतदान वाढणे किंवा कमी होणे, त्यामागे अनेक कारणे असतात. मतदार याद्याची अचूकता, हवामान, तापमान, उमेदवार, राजकीय पक्षांचे संघटन, असे अनेक कारण मिळून त्या मतदारसंघात मतदान होऊन मतदानाची टक्केवारी समोर येत असते. मात्र महाराष्ट्रात दुभंगलेल्या आणि फुटलेल्या पक्षांच्या मतदारसंघातच मतदानाची टक्केवारी का घसरली आहे, ही फक्त फुटलेल्या दुभंगलेल्या पक्षांसाठीच चिंतेची बाब नाही. तर लोकशाहीच्या वर्तमान स्थिती संदर्भात मतदार राजाचा छुपा मात्र बोलका कौलही असल्याचेही बोलले जात आहे. 


एकसंघ राहिलेल्या पक्षांचा मतदानाची टक्केवारी काय? 


आता एकसंघ राहिलेल्या आणि न फुटलेल्या भाजप आणि काँग्रेसची स्थिती बघितली तर असे लक्षात येतं की, भाजपनं 28 मतदार संघात निवडणूक लढवली, त्यापैकी 19 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. तर 9 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी काहीशी कमी झाली आहे. तर काँग्रेसने 17 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली.  त्यापैकी काँग्रेस लढवत असलेल्या 10 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे, तर फक्त 7 मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी झाली असल्याचे पुढे आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या