Maharashtra Lockdown : कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अशातच राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा आलेख आता उतरणीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु, 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार की निर्बंध हटवणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांनी लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वाचे संकेत दिले आहेत. 


1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार का? यासंदर्भात बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझाशी बोलताना लॉकडाऊनबाबतच्या प्रश्नांवर भाष्य केलं होतं. कोरोना रुग्णसंख्या कमी असणाऱ्या आणि मृतांचा आकडा कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये 1 जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले. निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरीही ते एकाच वेळी शिथिल होणार नाही. तर, टप्प्याटप्प्याने या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच यासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं.


मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही लॉकडाऊनसंदर्भात बोलताना महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता असल्याचं पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं. तसेच राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या बघूनच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसेच रेड झोनमधील जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आठवड्याभर आढावा घेऊन जिल्हानिहाय त्याबाबत निर्णय घेतले जातील. रेड झोनमधील जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर कडक लॉकडाऊन कायम राहणार आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.


सर्वसामान्यांसाठी मुंबईल लोकलचा प्रवास पुढील 15 दिवस नाहीच : विजय वडेट्टीवार


मुंबईतील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, पण संपलेला नाही. लोकल ट्रेन आम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवल्या आहे आणि त्याचा परिणाम दिसत आहे. काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावे लागतील. सरसकट सूट दिली तर गर्दी होईल. त्यामुळे लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.


राज्यातील कोणकोणते जिल्हे रेड झोनमध्ये?


राज्यात लॉकडाऊन लावूनही काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर नुकतीच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंधरा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची  बैठक बोलावली होती.  बुलढाणा (Buldhana), कोल्हापूर(kolhapur), रत्नागिरी(Ratnagiri), सांगली(sangli), यवतमाळ(yavatmal), अमरावती(amravati), सिंधुदुर्ग(Sindhudurga), सोलापूर(Solapur), अकोला(Akola),सातारा (Satara), वाशीम (Washim), बीड (Beed), गडचिरोली(Gadchiroli), अहमदनगर (Ahemdnagar), उस्मानाबाद (Osmanabad) या पंधरा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असून देखील रुग्णसंख्या कमी होत नसल्याची माहिती आहे. 


राज्यातील 15 जिल्ह्यात लॉकडाऊनचा प्रभाव नाही, महसूलमंत्र्यांनी बोलवली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक


'या' जिल्ह्यांमध्ये 10 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण


राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे. मुंबई-ठाण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक तसंच विदर्भातील नागपूर एवढ्याच जिल्ह्यात आता उपचार घेत असलेल्या म्हणजे ॲक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांपेक्षा जास्त आहे. यामध्ये मुंबईत 28284 आणि ठाण्यात 24894 सक्रिय रुग्ण आहेत तर पुण्यात 51182 सक्रिय रुग्ण आहेत. साताऱ्यात  18336 तर सांगलीत 12211 आणि कोल्हापुरात 14919 आणि सोलापुरात 18487 तर नाशिकमध्ये 15946 आणि अहमदनगरमध्ये 16903 उपचार घेत असलेले रुग्ण आहेत. विदर्भात नागपूरमध्ये कोरोनावर 17635 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. बाकी उर्वरीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या आत आहे. सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे तर मराठवाड्यात लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी आणि विदर्भात वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या तर पाच हजारांच्या आत आहे.


राज्याचा रिकव्हरी रेट 92.51 टक्क्यांवर 


राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहेत.  दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. आजपर्यंत एकूण 51,82,592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.51 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,32,77,290 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,02,19 (16.83 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :