Vijay Wadettiwar : आज सत्ताधाऱ्यांनी सभागृह बंद पाडले आहे. या सरकारनं दोन समाजात वाद निर्माण केला आहे. दोन्ही समाजाला सरकारनं झुंजवत ठेवल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलं. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी आम्हा सर्वांना चर्चेसाठी बोलावलं होत. पण सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना अजिबात विश्वासात घेतलं नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आणि सागितले होते की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ. मात्र, या सरकारने दोन्ही समाजाला झुंजवत ठेवल्याचे वडेट्टीवार म्हणाले. आमची मागणी एकच आहे की तुम्ही घेतलेली भूमिका सभागृहात मांडा असे वडेट्टीवार म्हणाले. 


भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांना सभागृह चालवायचे नाही


दरम्यान, सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून सभागृह चालवायचे नाही. विरोधकांवर खापर फोडण्याचे यांचे  काम सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. यांनी सरकारमधून राजीनामा द्यावा आणि सत्तेतून बाहेर पडावं आम्ही विषय मार्गी लावून दाखवू असेही वडेट्टीवार म्हणाले. आमच्या पर्यंत यांची भूमिका पोहोचली नाही. त्यामुळं आम्हाला बैठकीला जायचे नव्हते. आम्ही मराठा आणि ओबीसी समाजाच्या विरोधात नाही. सत्ताधाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे वडेट्टीवार म्हणाले. 


मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आज सभागृहात गोंधळ


मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आज सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप आमदार आशिष शेलार आणि आमदार अमित साटम यांनी काल बैठकीला न आल्यामुळे विरोधकांवर टीका केली आहे. त्यावरुन गदारोळ सुरु झाला आहे. महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण केली जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधीपक्षांनी बहिष्कार टाकला. विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आपली भूमिका काय? विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी असे, अमित साटम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गोंधळामुळं सभागृहाच कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. जेव्हा विरोधकांना बोलवलं तेव्हा बैठकीसाठी आले नाहीत. बाहेर वेगळं नाटक करता आणि नंतर चर्चेला येत नाही असे म्हणत आजप आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ऐनवेळी कुणाचा फोन आणि मेसेज येतो की, अचानक बैठकीला येत नाहीत. यांचा सभागृहाबाहेरील बोलवता धनी कोण? खरं काय ते समोर आलं पाहिजे असेही शेलार म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


मराठा आरक्षणावरुन सभागृहात गोंधळ, विरोधक बैठकीला गैरहजर राहिल्यानं सत्ताधाऱ्यांचा संताप, विधानसभेचं कामकाज तहकूब