Ashadhi Wari 2024 : यंदा राज्यातील अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस सुरु झाल्याने बळीराजा पेरण्या उरकून मोठ्या संख्येने आषाढी यात्रेसाठी (Ashadhi Wari) पंढरपूरकडे निघाला आहे. दरवर्षीपेक्षा यंदाच्या यात्रेत दीडपट भाविक जास्त येण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कुंकू, बुक्का तयार करून ठेवला आहे. यातच विठ्ठल मंदिराला मिळालेले 700 वर्षापूर्वीचे रुप हे भाविकांसाठी मोठं आकर्षण असून ज्ञानोबा, तुकारामांच्या काळातील मंदिर कसे असेल हे पाहण्यासाठी यंदा भाविक मोठ्या संख्यने पंढरीजवळ पोहोचू लागले आहेत. 


150 टन कुंकवाची निर्मिती पूर्ण


  आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक येथून नेहमीच सौभाग्यालंकार म्हणून ओळखले जाणारे कुंकू आणि विठुरायाचा बुक्का खरेदी करण्यास प्राधान्य देत असतो. विशेषतः महिला भाविक यात्रा संपवून जाताना कुंकू, बुक्का, अष्टगंध, चंदनाची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांकडून जवळपास 150 टन कुंकू आषाढीच्या काळात लागत असतो. अशा वेळी वर्षभर बनवूनही तेवढे कुंकू तयार करण्याची ताकद येथील कारखानदारात नसल्याने राज्यभरातून येथे कुंकवाची आयात होत असते. मात्र, कुंकू खरेदी करताना चोखंदळ भाविक हळदीपासून बनविलेल्या म्हणजेच पिंजर कुंकवाला पसंती देत असल्याने हे पहिल्या दर्जाचे कुंकू पंढरपूरमध्येच मोठ्या प्रमाणात बनविले जाते. याचप्रमाणे बनविलेले कुंकू भाविकांना आकर्षिक करण्यासाठी मोठमोठ्या परातीत साधारण 800 ते एक हजार किलो कुंकवाचे मोठे ढीग बनवून ठेवण्यात येतात. याला पंढरपुरी भाषेत 'परात लावणे' असं म्हणतात. पंढरपूरचा कुंकू हे बाजारपेठेचे एक वैशिष्ट्य असते. ग्राहक आल्यावर याच कुंकवाच्या डोंगरातील मागे असणारे कुंकू भाविकांना दिले जाते. कोणत्याही दुकानात गेला तरी अशा पराती लावण्याची पद्धत इथे दिसून येते. ही परात लावण्यासाठी किमान 4 ते 5 तास अतिशय सहनशक्ती ठेवून बारकाईने हे काम केले जाते. या पराती लावून त्यातील कुंकू मागच्या बाजूने काढून भाविकांना विकताना हा उंच ढीग ढासळणार नाही याचीही काळजी घेतली जाते.   


  कुंकू बनविण्यासाठी अलीकडच्या काळात स्टार्च पावडर, चिंचोका पावडर, मका पावडर यांपासून बनविलेले कुंकू दुसऱ्या दर्जाचे मानले जाते. याशिवाय हलक्या दर्जाचे स्वस्तातील कुंकू राज्यभरातून येत असले तरी भाविकांच्या हळदीचे आणि स्टार्चपासून बनविलेल्या कुंकवास मोठी मागणी असते. यात्रा काळात नुसत्या कुंकवाची उलाढाल 15 ते 20 कोटी रुपयाची होत असल्याने व्यापाऱ्यांसाठी हा मोठा सुगीचा काळ असतो. यामुळेच हे कारखानदार जवळपास दीड ते दोन महिन्यांपासून आषाढीच्या खास तयारीला लागलेले असतात. तयार केलेले कुंकू वेळेत वाळवून बाजारपेठेत पाठविणे यासाठी मोठ्या जागा लागतात. यंदा पाऊसकाळ लवकर सुरु झाल्याने आभाळ नसताना हे तयार केलेले कुंकू वाळविणे हे उत्पादकांसाठी आव्हानात्मक काम होते.


'अशी' केली जाते कुंकवाची निर्मिती


  कुंकू बनविताना पहिल्यांदा ग्रॅण्डरमध्ये बारीक एकजीव करून घेऊन मग मिक्सरमध्ये टाकून फिरविले जाते. यावेळी या मिश्रणात ठरलेले मिश्रण केल्यावर लाल रंगांच्या विविध छटात कुंकू तयार होते. त्यानंतर मात्र तयार झालेले कुंकू काही दिवसांसाठी कडक उन्हात वाळत घालावे लागत असल्याने सर्वसाधारणपणे एप्रिल आणि मेमध्ये हे कुंकू तयार करण्यात येते. जितके ऊन चांगले तेवढी कुंकवाची प्रत चांगली बनत असते. तयार केलेले हे कुंकू वाळविण्यासाठी उघड्यावर पसरून ठेवत त्याला ऊन दिले जाते. कुंकवा प्रमाणेच अष्टगंध, गुलाल आणि बुक्का देखील तयार केल्यावर वाळविण्यासाठी बाहेर ठेवावा लागतो. तयार झालेले कुंकू शहरातील व्यापारी दोन महिने आधीपासून खरेदी करून त्याच्या पॅकिंगमध्ये गुंतलेले असतात. चांगल्या प्रतीच्या बुक्क्याची निर्मिती तुळशी अथवा इतर लाकडाच्या भुश्यापासून होते तर दुसऱ्या दर्जाचा बुक्का हा कोळश्याच्या भुकटीपासून तयार होतो.


  प्रत्येक वारकरी पंढरपूरवरून परतीला निघताना विठुरायाचा हा कुंकू बुक्क्याचा प्रसाद गावाकडे पाहुणे, मित्र आणि शेजाऱ्यांना देऊनच या सग्यासोयरांना वारी पोहोचवत असतात. आपल्या ज्या सग्या सोयऱ्यांना वारीला येणे शक्य झाले नाही त्यांना या प्रसादाच्या रुपाने विठुरायाचे दर्शन व्हावे आणि आपल्या घरातही हा प्रसादरूपी विठुरायाला घेऊन जाणे हाच यामागचा उद्देश असतो. ही प्रथा वारकरी संप्रदाय पिढ्यानपिढ्या पाळत आले असल्याने मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग परिसरात शेकडो कुंकू व्यापाऱ्यांची दुकाने आणि यामुळेच आषाढी यात्रेत कुंकवाची बाजारपेठ मोठी मानली जाते.