Kolhapur Violence: राज्यात मागील काही महिन्यांपासून तणाव सुरू असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या मु्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रात सध्या दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचं वातावरण षडयंत्र दिसून येतंय. गेल्या 10 महिन्यात असे प्रश्न समोर येत आहेत, याच्यामागे सूत्रधार कोण आहेत हे शोधलं पाहिजे असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटले. 


नाना पटोले यांनी कोल्हापूर आणि राज्यातील इतर ठिकाणी उफाळून आलेल्या हिंसाचाराच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली. त्यांनी पुढे म्हटले की, महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? राज्यात दंगली घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसल्यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचसोबत मुंबईसारख्या सुरक्षित शहरामध्ये एका विद्यार्थीनीची वसतीगृहात अत्याचार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. राज्यात पोलिसांचे नाही तर समाजकंटकाचे आणि गुन्हेगाराचे राज्य आहे अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले. 


देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्यावर आणि पोलिसांवर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेऊन सक्षम गृहमंत्री नेमावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पंचनामा करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, या सरकारच्या काळात औरंगजेबाचे उदात्तीकरण सुरु आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आत्ताच बिळातून बाहेर कसे आले? राज्यात रोज दंगली सुरु आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री काय करत आहेत? असा सवाल त्यांनी केला.


शिंदे फडणवीस सरकार नपुंसक आहे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते ते खरेच आहे.  संभाजीनगर, अहमदनगर, शेवगाव, अमरावती, नाशिकमध्ये धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न मागील महिन्यात झाला पण लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने तो प्रयत्न फसला असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. आता पुन्हा धर्मांध शक्ती अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्यात औरंगजेबाचा मुद्दा पुढे करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस खात्याचा वचक असेल तर गुन्हेगारांची अशी हिम्मत होणार नाही. राज्यात धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन दंगली भडकावून आपली राजकीय पोळी भाजपाचा कुटील डाव आहे. त्यामुळे फडणवीस जाणिवपूर्व अशा घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे हे गृहविभागाचे काम आहे पण गृहमंत्री आणि पोलीस यंत्रणा काय करते आहे? हा राज्यातील जनतेला पडलेला प्रश्न असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने 19 मे रोजी या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत आणि महिला सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती. पण दुर्देवाने या संदर्भात काहीच कारवाई होताना दिसत नाही. गुन्हेगारांना जरब बसेल अशी कारवाई होणे गरजेचे आहे पण सरकार केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये व्यस्त आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. फडणवीस यांच्याकडे गृह खात्याबरोबरच अर्थ, ऊर्जा, गृहनिर्माण, राजशिष्टाचार अशा सहा विभागांचा कारभार असून सहा जिल्ह्यांचे ते पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते गृह विभागाला योग्य न्याय देऊ शकत नाहीत. फडणवीस यांच्याकडील गृहखाते तात्काळ काढून घ्यावा आणि राज्याला अनुभवी, सक्षम व पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा असे पटोले म्हणाले. 


शिवसेना ठाकरे गटही आक्रमक 


महाराष्ट्रात सध्या दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचं वातावरण षडयंत्र दिसून येत असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल परब यांनी म्हटले. गेल्या 10 महिन्यात असे प्रश्न समोर येत आहेत. याच्यामागे सूत्रधार कोण आहेत हे शोधलं पाहिजे. महाराष्ट्रात अशांतता असेल तर याचा परिणाम गुंतवणूकीवर होऊ शकते हे महाराष्ट्रासाठी धोक्याचं असल्याचे  अॅड. परब यांनी म्हटले. 


येत्या काळात निवडणुका लवकर लागण्याच्या शक्यता आहे. कोण तरी जाणूनबुजून घडवू इच्छित असल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनांमा सूत्रधार कोण आहेत हे शोधलं पाहिजे, असेही त्यानी म्हटले. महाराष्ट्रात अशांतता असेल तर याचा परिणाम गुंतवणूकीवर होऊ शकते हे महाराष्ट्रासाठी धोक्याच याकडे त्यांनी लक्ष वेधले.