Maharashtra Home Minister Dilip Walse Patil : विविध गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये असलेल्या कैद्यांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोठी बातमी आहे. आता जेलमध्ये कैद्यांना कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे हे कर्ज घेण्यासाठी त्यांनी तारण नाही.  जेलमध्ये कैद्यांना 50 हजारांचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. 


पुण्यात आयोजित महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळं कैद्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले की, राज्यात काही राजकीय सभा आहेत. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी आम्ही घेतोय. आम्ही सज्ज आहोत, असं वळसे पाटलांनी म्हटलं. 


दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आता राज्यातील जेलमध्ये असणाऱ्या कैद्याला कर्ज दिलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने प्रस्ताव दिला होता. त्याला सरकारने मंजुरी दिली आहे. ते कर्ज आजपासून वाटप सुरू होत आहेत. 50 हजार रुपये कर्ज दिलं जाणार आहे, असं त्यांनी म्हटलं. वळसे पाटलांनी सांगितलं की, कोर्टाने त्यांना दंड केलेला असतो त्यांच्याकडे पैसे नसतात म्हणूण त्यांच्यासाठी हे कर्ज असणार आहे. जेलमध्ये काम करून पैसे भरणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.


दिलीप वळसे पाटील म्हणाले की,  राजकीय सभा किंवा कार्यक्रम सुरू असतात. कायदा सुव्यवस्था ठेवणे पोलिसांचं काम आहे. पोलीस विभाग सज्ज आहे. सर्वांनी सामाजिक सलोखा ठेवावा. सभेला परवानगी दिली ती अटी शर्थी टाकून दिली आहे, असं ते म्हणाले. 


कैद्यांना कर्ज उपलब्ध करून देणारी ही देशातील पहिली योजना


महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांसाठी कर्ज देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे.  कैद्यांना कर्ज उपलब्ध करून देणारी ही देशातील पहिली योजना असून आज 1 मे रोजी या योजनेची सुरुवात होतेय. कारागृहात दीर्घ मुदतीची शिक्षा भोगणाऱ्या परंतु चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांना राज्य सहकारी बॅकेकडून कर्ज देण्यात येणार आहे. हे कर्ज कैद्यांच्या नावे असेल मात्र त्याचा उपयोग कैद्याचे नातेवाईक वेगवेगळ्या कारणांसाठी करु शकणार आहेत. कैद्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना कर्ज मिळण्यासाठी होण्याऱ्या अडचणी यातून दूर होणार आहे.  येरवडा कारागृहातील 250 कैद्यांची कर्ज योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे.