Ladki Bahin Yojana : राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही एक जुलैपासून सुरू केलीय. या योजने अंतर्गत 19 ते 65 वर्षातील महिलांना प्रत्येक महीन्याला 1500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. त्या नुसार योजनेचे अर्ज भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिला, पुरुष ग्रामपंचायत कार्यालयावर मोठी गर्दी करताना दिसत आहे. या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया (Offline Application Process) सुरू झाली आहे.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी 15 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही ठिकाणी संबंधित विभागाचे काही कर्मचारी महिला लाभार्थ्यांची लूट करत असल्याच्या धक्कादायक घटनाही पुढे आल्या आहेत. 


महत्वाकांक्षी योजना ठरतेय डोकेदुखी?


दरम्यान, बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथील ग्रामपंच्यायत मध्ये अर्ज भरण्यासाठी महिला पुरुषांची एकच गर्दी झाली होती. त्यावेळी तलाठी श्री काळे यांनी ग्रामस्थांशी हुज्जत घालत अर्ज स्वीकारणे बंद केले आणि माझी तक्रार कुठेही करा, आमदार, खासदार किंवा तहसीलदार यांच्याकडे तक्रार करा. मी अर्ज घेत नसल्याचे जाहीर करीत तलाठी निघून गेल्याचे वायरल व्हिडीओ मध्ये दिसून येत आहे. त्यामुळे एकीकडे महिलांसाठी महत्वाकांक्षी  ठरलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लगत असल्याचे चित्र आहे.


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्र्यांची  घोषणा


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या वयामध्ये शिथिलता कऱण्यात आली आहे. वयोमर्यादा आता 5 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता 65 वर्षांपर्यंतच्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. याआधी 21 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता. पण आता ही मर्यादा 65 वर्षांपर्यंत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर केला आहे. त्याशिवाय ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. परंतु, ही जमिनीची अटही आता शिथिल करण्यात आली आहे. जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या