लातूर : माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पहाटे पुणे येथे निधन झाले. पहाटे 2.15 वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. आज निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दोन दिवसांपूर्वीच कुटुंबीयांनी ते कोरोनातून मुक्त झाल्याचे जाहीर केले होते. निलंगेकर यांना दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाला होता. ते पुण्यात होते. आज सकाळी त्यांचे शव पुण्याहून निलंग्याकडे रवाना होणार आहे. आज दुपारी अंत्ययात्रा निघणार असून आजच अंतिम संस्कार केले जाणार आहेत.


दोन दिवसापूर्वीच त्यांनी कोरोनावर यशस्वी मात करुन ते घरी परतले होते. परंतु, पुन्हा त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे पहाटे उपचार सुरु असतानाच त्यांना मृत्यूने गाठलं.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. लातूरच्या माजी खासदार रुपाताई निलंगेकर या त्यांच्या सूनबाई, तर राज्याचे माजी मंत्री आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू होत. बुधवारी दुपारी निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

91 व्या वर्षी त्यांनी कोरोनावर मात करत त्यांनी सर्वांना सुखद धक्का दिला होता. दोन दिवसांपूर्वीच ते कोरोनामुक्त झाले होते. त्यांना मधुमेह, रक्तदाब, किडणीचा त्रास त्यातच कोरोनाची लागण झाली होती. मात्र डाॅक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागातील विलगीकरणात ठेवले होते. त्यांनी मोठ्या जिद्दीने कोरोनावर मात केली होती.

शिवाजीराव निलंगेकर पाटील हे महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते. 1985-86 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते. तर 1990-91 या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद होते.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे राजकीय जीवन संघर्षमय राहिले. अतिशय शिस्तप्रिय म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यसेनानी म्हणून सरकारने त्यांचा गौरव केला. तरी स्वांतत्र्यसैनिकांना मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ त्यांनी कधी घेतला नाही.

शिवाजीराव निलंगेकर यांचा जनसंपर्क दांडगा




निलंगा विधानसभा मतदारसंघाचे सर्वाधिक काळ आमदार राहिलेले शिवाजीराव निलंगेकर यांचा जनसंपर्क दांडगा होता. निलंगा तालुक्यात शैक्षणिक गंगा आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही, यासाठी त्यांनी कायमच कामे केली. तळागाळातील जनतेचा कैवार घेवून काम करत राहा, असे ते सतत सांगत ही होते.