Maharashtra: देशभरातील कृषी उत्पादनांना दिल्या जाणाऱ्या भौगोलिक मानांकनात (GI tag) महाराष्ट्राला पहिला नंबर मिळालाय! भारतातील एकूण २०० कृषी उत्पादनांपैकी राज्यात ३८ कृषी उत्पादनांना हा जीआय टॅग देण्यात आला आहे. कृषी मालाची विशेष ओळख आणि खास गुणवत्ता यांचे जतन करण्यासाठी भौगोलिक मानांकन देण्यात येतं.  कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे.


काय फायदा होतो जीआय टॅगचा?


 एखादे उत्पादन विशिष्ट भागातच घेतले जात आसेल आणि त्या उत्पादनाला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला भौगोलिक मानांकन दिले जाते. कोणत्याही उत्पादनाला भौगोलिक मानांकन मिळाल्यास त्या उत्पादनाचे उगमस्थान निश्चित होते.भौगोलिक मानांकन प्राप्त पिकाच्या कार्यक्षेत्रातील संबंधित पिकाच्या उत्पादकांची भौगोलिक संकेत (नोंदणी व संरक्षण) अधिनियम 1999 अंतर्गत अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी केल्यास भोगोलिक चिन्हांकनाचा लोगो लावून उत्पादनाची विक्री करता येते.


पिकाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्माची ओळख निर्माण करुन विक्री केल्यास उत्पादकास अधिकची किंमत मिळते. राज्याला लाभलेले वैशिष्ट्यपूर्ण वातावरण व नैसर्गिक जैवविविधतेमुळे नवीन कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त करण्यास प्रचंड वाव आहे. देशातील नवीन पिकास भौगोलिक मानांकन अदा करण्याची कार्यवाही चेन्नई येथील भौगोलिक मानांकन रजिस्ट्री येथून करण्यात येते.


अधिकृत वापरकर्त्यांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 61 %


कृषी उत्पादनाच्या देशात एकूण झालेल्या उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणीमध्ये महाराष्ट्राचा ६१ % वाटा आहे. तसेच ५००० प्रस्तावांना देखील लवकरच मान्यता मिळून अधिकृत वापरकर्ता नोंदणीत मोठी वाढ होणार आहे. राज्यात भौगोलिक मानांकन प्राप्त पिकाचे अधिकृत वापरकर्ता नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येते. सन २०१९-२० अखेर १२३२ उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणी झाली होती. संचालक फलोत्पादन  विभागामार्फत उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आल्याने सन २०२४ अखेर ११४२३ उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणी झाली आहे. 


कायदेशीर संरक्षण आणि निर्यातसंधी


अधिकृत वापरकर्ता नोंदणीने भौगोलिक क्षेत्राशी निगडित मालास कायदेशीर संरक्षण प्राप्त होते. भौगोलिक चिन्हांकन मालास निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होतात, अशा नोंदणी करत कृषी मालास राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडींग होण्यास मदत होते. 


व्यापारी चिन्हाला बाजारपेठेत जे महत्त्व असते तेच महत्त्व कृषिमालाच्या भौगोलिक चिन्हांकनासह असते, त्यामुळे असे नोंदणी केलेल्या उत्पादनाच्या उत्पादकाला जास्तीचे आर्थिक उत्पन्न मिळून त्याच्या उन्नतीस हातभार लागतो. भौगोलिक मानांकन प्राप्तीमुळे भारतीय कृषी निर्यातीस जागतिक बाजारपेठेत निश्चितच लाभकारक ठरणार आहे.


हेही वाचा:


Nanded News : माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला 'जीआय टॅग'