मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. आज 5,609  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 720 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 59 हजार 676 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.8टक्के आहे. 


राज्यात आज 137 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 30 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  66 हजार 123 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (4), धुळे (0) , हिंगोली (78), नांदेड (52), अमरावती (76), अकोला (34), वाशिम (18),  बुलढाणा (60), यवतमाळ (10), वर्धा (11), भंडारा (1), गोंदिया (2), चंद्रपूर (73),  गडचिरोली (26) या नऊ जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13, 892 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


मालेगाव, धुळ्यात, नंदूरबार, परभणी, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया,  आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर  साताऱ्यामध्ये सर्वाधिक 782 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 99,05, 096 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,63, 442 (12.75 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,13,437 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 860 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या 28,208 रुग्णांची भर 


देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख आता कमी होताना दिसत असून सोमवारी गेल्या पाच महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आढळली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या 28,208 रुग्णांची भर पडली असून 373 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर गेल्या 24 तासात 41,511 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल एकाच दिवशी 13,680 सक्रिय रुग्णसंख्या कमी झाली आहे. या आधी 15 मार्चला 24,492 रुग्णसंख्येची नोंद झाली होती.