मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतानाही अजून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढत आहे. कोल्हापूरमध्ये हजार तर सांगलीमध्ये हजारच्या जवळपास दैनदिन रुग्ण आढळत आहेत. राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 8 हजार 535 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर आज 6 हजार 13 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 59,12,479 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 टक्के इतके झाले आहे.

  


कोल्हापूर, सांगलीत रुग्णसंख्या कमी होईना 
कोल्हापूर जिल्ह्यात आज 1 हजार 193 नवीन कोरोना बाधित आढळले तर सांगलीत 927 रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी कोल्हापुरात 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तिकडे सांगलीतही 19 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. राज्यात दुसरी लाट ओसरत असताना या दोन जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. यामुळे प्रशासन चिंतेत असून नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 


दोन जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या शून्यावर
आज नांदेड आणि भंडारा जिल्ह्यात सगल दुसऱ्या दिवशी एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळेलेला नाही. त्यामुळे नागरिक आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर हिंगोली, यवतमाळ, गोंदिया, धुळे या जिल्ह्यांमध्ये 1 ते 3 अश्या संख्येत रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.


मुंबईत गेल्या 24 तासात 558 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 558 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 15 जणांचा कोरोनाने जीव गेला. मुंबईत आतापर्यंत 15 हजार 627 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. सध्या मुंबईत 11 हजार 423 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. 


गेल्या 24 तासात 41,506 नवीन रुग्णांची भर
देशात कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असला तरी, धोका मात्र अद्याप टळलेला नाही. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 41,506 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 895 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शुक्रवारी देशात 42,766 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. अशातच गेल्या 24 तासांत देशात 41,526 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.