परभणी : ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर आणि तेथील ऑक्सिजन बेडची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार, 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येणार आहेत. राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी खरीप हंगाम लक्षात घेता राज्यातील कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व आस्थापनं दिवसभर सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.


परभणीत कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कृषी क्षेत्राच्या लातूर विभागीय आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत कुठेही अडचण होऊ नये याचा विचार करुन आता सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शेती आणि शेतीशी निगडीत असलेल्या व्यवस्थापनांची, ट्रॅक्टर दुरुस्तीची आणि ड्रिपची आस्थापनं चालू ठेवण्यास अनुमती देण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यावर्षी मान्सून वेळेवर असून पेरणी आणि इतर शेतीविषयक कामांसाठी या सुविधा कोविडचे सर्व नियमे पाळून सुरु ठेवण्याबाबत खबरदारी घेण्याचेही यावेळी बोलताना कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.


राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम राहणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवारी) जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. काल कोरोनाची रुग्णसंख्या 18 हजारांवर आली आहे. मात्र पहिल्या लाटेतील ही संख्या सर्वोच्च होती. शहरातील कोरोना आटोक्यात आला असला तरी ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणं गरजेचं आहे. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 


कोरोनाच्या परिस्थितीत आता फरक दिसत आहे परंतु म्हणावे तितके आकडे खाली आले नाहीत. रुग्णसंख्या कमी होत चालली असली तरी गेल्या वेळच्या सर्वोच्च संख्येच्या जवळ आपण आता आलो आहोत. दुसर्‍या लाटेतला विषाणू झपाट्यानं पसरतोय. त्यामुळे कडक लॉकडाऊन नाही परंतु निर्बंध कायम राहणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव अजूनही वाढत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 


कोरोनामुक्त गावाचा संकल्प करुया, मुख्यमंत्र्यांचं आवाहन


कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करुन देशासमोर उत्तम उदाहरण घालून देऊया, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी रविवारी (30) मे सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधून कोरोना, लॉकडाऊन, च्रकीवादळ यासह विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी चांगली कामगिरी करुन कोरोनामुक्त गाव करणाऱ्या संरपंचांचे कौतुक देखील केलं.


आपण राज्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी', 'मी जबाबदार', अशी वेगवेगळी अभियानं यशस्वीरित्या राबवली. आता शहर आणि गावांनी ठरवलं तर आपण कोरोना मुक्त गाव आणि कोरोनामुक्त शहराची संकल्पना यशस्वीरित्या राबवू शकू. प्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर कोरोनामुक्त झालं तर राज्य कोरोनामुक्त होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचं आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करुया," असं आवाहन त्यांनी केलं. तसंच मुख्यमंत्र्यांनी आपल्या संबोधनात गाव कोरोनामुक्त केलेल्या पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख आणि कोमलताई करपे या तीन सरपंचांच्या कामाचा गौरव केला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :