Chhatrapati Sambhaji Nagar News : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पोलीस महासंचालक यांना एक पत्र लिहले असून, त्यात छत्रपती संभाजीनगर पोलीस (Chhatrapati Sambhaji Nagar Police) कसे वागतात याबाबत तक्रार करण्यात आली आहे. तसेच शहर पोलीस कशाप्रकारे हप्ते वसूल करतात आणि त्यांचे आपल्या कर्तव्यावर लक्ष नसल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे पोलीस कर्मचारीपासून तर पोलीस निरीक्षकांपर्यंत कसे हप्ते वसुली केले जातात याचा उल्लेख दानवे यांच्या तक्रारीत करण्यात आला आहे. तर हे सर्व पोलीस आयुक्त निखील गुप्ता (IPS Nikhil Gupta) यांच्या आशीर्वादाने सुरु असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. 


यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, एकीकडे पोलीस आयुक्त मोठमोठ्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे शहरात मोठ्याप्रमाणावर अवैध धंदे सुरु आहेत. पोलिसांकडून शहरात हप्ता वसुली मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. पोलीस आयुक्त मोठ-मोठ्या गप्पा मारतात, पण खाली काय सुरु आहे. शहरात सर्वत्र गुटखा विक्री जोरात सुरु असून, कोणाकडे काय येते, कोणाला किती हप्ता येतो. तसेच कोणत्या-कोणत्या गोष्टीसाठी हप्ते सुरु आहेत, याची संपूर्ण यादीच माझ्याकडे असल्याचं दानवे म्हणाले. शहरात गुटखा, मटका, अवैध लॉटरी सुरु आहे, मुरूम तस्करी सुरु आहे, लॉज वाल्याकडून हप्ते घेतले जात आहे, वाईन शॉप वाल्याकडून हप्ते घेण्यात येते, जुगार अड्डे चालवण्यासाठी हप्ते दिले जातात, वाळू माफियाकडून हप्ते येतात, गॅस रिफिलिंगसाठी हप्ते घेतले जातात, असा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे. 


पोलीस अधिकारी विमानाने पैसे पोहचवतात...


तर काही पोलीस अधिकारी आपण किती कडक वागतो असे दाखवतात. पण हे फक्त हप्ते वाढवून मिळवण्यासाठी केलं जातं. वाळूज आणि वाळूज एमआयडीसी भागात अशाप्रकारे अवैध धंदे जोरात सुरु आहेत. आधीचा अधिकारी गेल्यावर आणि नवीन अधिकारी आला की लगेच हप्ते वाढवून घेतले जात आहे. शहरात पोलिसांकडून सध्या कोट्यवधी रुपयांची हप्ते वसुली सुरु आहे. त्यामुळे हप्ते वसूल करणाऱ्या पोलिसांवर कोणाचा आशीर्वाद आहे. हे सर्व पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या आशीर्वादाने सुरु आहे. याच तक्रारीत एका पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा उल्लेख केला असून, हे अधिकारी महोदय विमानाने प्रवास करतात आणि पैसे पोहचवतात असा गंभीर आरोप दानवे यांच्या पत्रात करण्यात आला आहे. 


शहरातील वादाला देखील पोलीसच जबाबदार...


तर पोलीस महासंचालक यांना पत्र लिहण्याचे कारण म्हणजे, छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या दंगलीसाठी पोलीसच जबाबदार आहेत. दंगल जास्तवेळ चालली यासाठी पोलीस आयुक्त जबाबदार आहेत. पोलिसांचे अनेक वाहने जाळण्यात आले, याला पोलीस प्रशासन, पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त जबाबदार असून, ते घटनास्थळी उशिरा पोहचले होते. त्यांनी अनेक फोन उचलले नाही. काही पोलीस निरीक्षक यांना पुढे करून मोठे अधिकारी मागे राहिले. या दंगलीचा या अधिकाऱ्यांनी सामना करायला हवा होता, पण त्यांनी केला नाही, असेही दानवे म्हणाले. 


Ambadas Danve letter : पोलीस आयुक्त ते पीआय, वसुली रेट काय? अंबादास दानवेंचं खळबळजनक पत्र



इतर महत्वाच्या बातम्या: 


आधी हात धरला, मग मोबाईल नंबर मागितला; स्मार्ट सिटी बसमध्ये कंडक्टरचं विद्यार्थिनीसोबत विचित्र कृ्त्य