Maharashtra Breaking 22nd July LIVE Updates: जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही; केंद्र सरकारची लेखी उत्तरात माहिती 

Maharashtra Breaking 22nd July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 22 Jul 2024 05:29 PM
मनोरमा खेडकर यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

मनोरमा खेडकर यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे, मनोरमा खेडकर यांची रवानगी येरवडा कारागृहात होईल. न्यायालयाने आज मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मनोरमा खेडकर यांच्या वकिलांनी यांची सुटका व्हावी यासाठी तात्काळ जामीन अर्ज दाखल केला होता. दरम्यान, शेतकऱ्यांना पिस्तूल घेऊन धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे, मनोरमा खेडेकर या वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री आहेत.

त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन येणाऱ्या मामा- भाच्याचा भीषण अपघात

नाशिकच्या त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन येणाऱ्या मामा भाच्याचा दुचाकीचा भीषण अपघात  झाला आहे.  चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने  हा भीषण अपघात  झाला आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.  दुचाकीवर मामा भाचे त्र्यंबक राजाचं (Trimbakeshwar) दर्शन घेऊन घरी परत असताना महिरावणी गावाजवळ चार चाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.  सुदैवाने कोणतीही  जीवितहानी झाली नाही. मामा - भाचा  दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून 15 मिनिटे चर्चा झाली आहे. या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी आतापर्यंत काय प्रयत्न केले, याबाबत माहिती दिली. शरद पवार यांनी याआधी सरकार मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाके यांना काय आश्वासन देत आहे याबाबत विरोधी पक्षाला काहीच माहिती नसते असे बोलून दाखवले होते. त्यानंतर आता शिंदे यांनी सरकारने मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काय काय केले आहे, याची माहिती शरद पवार यांना दिली आहे. या भेटीनंतर आता विरोधी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात पावसाची विश्रांती; तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक मार्ग बंद झाले होते आजची जर स्थिती बघितली तर यात 4 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे तर 30 लहान मार्ग बंद आहेत त्यामुळे या मार्गावर अनेक वाहने अडकलेले आहेत. 

Jalgaon News: मुसळधार पाऊस, दुथडी भरून वाहणारी नदी; शाळेला जाण्यासाठी रस्ता नसल्यानं महिन्याभरापासून विद्यार्थ्यांची दांडी

Jalgaon News: शाळेत जाण्यासाठी नदीतून प्रवास करावा लागतो, मात्र सध्या नदीला पाणी असल्याने शाळेत जाण्यासाठी पंधरा किमी फेऱ्या मारून जावं लागत असल्यानं जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंपरी प्र उत्रांन गावातील शंभरहून अधिक विद्यार्थिनी महिना भरापासून शाळेला दांडी मारली आहे,तर काहींनी नदीतून वाट काढत शाळेत जाण्याचा प्रयत्न केला असल्याचं पाहायला मिळत आहे.  जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंपरी प्र उत्राण या गावात इयत्ता पाचवी पर्यंत शाळा आहे,त्यामुळे इयत्ता सहावी च्या पुढे शिक्षण घेण्या साठी या गावातील मुलांना एकतर पारोळा या ठिकाणी जावे लागते तर काहींना बाजूच्या मोंद्धळा गावात जावे लागते,या गावात जाण्या साठी बोरी नदीतून जावे लागत असते,मात्र सध्या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने, बाजूच्या गावात शाळेत जायचे असेल तर  नदी वरील पुलाचे काम सध्या बंद असल्याने,एक तर नदीच्या पाण्यातून जावे लागते किंवा पंधरा किमी फेरा मारून जावे लागते मात्र यासाठी बसची किंवा खासगी वाहनांची व्यवस्था नसल्याने या गावातील शंभर हून अधिक विद्यार्थ्यांनी सध्या शाळेला दांडी मारणे च पसंत केले आहे तर काहींनी नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करत शाळेची वाट धरली आहे. पुलाचे काम लवकर करण्यात यावर किंवा बसची व्यवस्था  तातडीने करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी केली आहे

Maharashtra News: जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही; केंद्र सरकारची लेखी उत्तरात माहिती 

Maharashtra News: जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही


केंद्र सरकारची लेखी उत्तरात माहिती 


जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी निराशाजनक बातमी..


जुन्या पेंशन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला केंद्र सरसारला होता प्रश्न


जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का ?


सरकारकडून मिळालेलं लेखी उत्तर -


जुन्या पेंशन योजनेबाबत सरकार चा कोणताही विचार नाही


गेल्या अनेक वर्षापासून सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक आहेत

Maharashtra News : राज्यभरातील महसुल कर्मचाऱ्यांचे आठव्या दिवशीही काम बंद आंदोलन

Maharashtra News : दांगट समितीने महसुल कर्मचाऱ्यांना आकृती बंध लागु करण्याबाबत दिलेला अहवाल सरकारने मान्य करून तात्काळ आकृती बंध लागु करावा या मागणीसाठी मागच्या 8 दिवसांपासुन राज्यभरातील महसूल कर्मचारी संपावर गेले आहेत.परभणीत ही महसुल कर्मचारी संघटने कडुनही आंदोलन केले जात असुन सर्व महसुल कर्मचाऱ्यांनी काम बंद करत जिल्हाधिकारी कार्यालया समोर जोरदार घोषणाबाजी केली आहे.यामुळे राज्यातील सर्वच जिल्हाधिकरी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. 2 वर्षांपासून याबाबत आम्ही लढा देत असुन सरकार आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेत नसल्याने आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करत असुन जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या आंदोलकांनी व्यक्त केलाय.

Sangli News : साळच्या पाण्यासाठी जत तालुक्यातील संख येथे ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन

Sangli News : एकीकडे सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असताना दुसरीकडे  जत तालुक्यातील संख मध्ये ग्रामस्थांनी पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या कृष्णेच्या पाण्यासाठी रास्ता रोको केला. पावसाळ्यात  कृष्णेतून कर्नाटकात वाहून जाणारे पाणी जत तालुक्यातील पूर्वेकडील पाण्यापासून वंचित असलेल्या गावाना द्या अशी मागणी या रस्ता रोकोच्या माध्यमातून करण्यात आलीय.  कृष्णेचे माडग्याळ मध्ये म्हैसाळ योजनेतुन  पाणी आलेले आहे. याच मार्गे पूरपरिस्थिती काळात वाहून जाणारे पाणी  जत तालुक्यातील पूर्वकडील  व्हसपेठ, गुड्डापूर, संख, अंकलगी गावातील तलावात सोडावे अशी मागणी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनी केलीय. संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हभप तुकाराम बाबा महाराज यांनी हे  आंदोलन केले.

Nandurbar News : आदिवासी संघटनांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू

Nandurbar News : नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाचा समोर गेल्या 25 दिवसांपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी विविध आदिवासी संघटनांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे संघटनांच्या आंदोलनाला लेखी आश्वासन मिळत नसल्याने आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली समस्त आदिवासी संघटनांनी नवापूर येथे सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले असून रस्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक जाम झाली असून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत सरकार आंदोलकांना लेखी आश्वासन देत नसल्याने आदिवासी संघटनांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. येत्या काळात अजून तीव्र आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. 

Raigad Rains : रायगड जिल्ह्यात मागील 48 तासांपासून मुसळधार पाऊस

Raigad Rains :  रायगड जिल्ह्यात मागील 48 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने देखील धोक्याची पातळी गाठली होती. यामुळे पुन्हा एकदा महाड शहरासह आजूबाजूच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला होता. 22 जुलै हा दिवस महाडकरांसाठी नेहमीच धोकादायक दिवसच मानला जातो. कारण या दिवशी सावित्री नदी आपला रौद्ररूप धारण करून पूर परिस्थिती निर्माण करते, याच दिवशी 2021 चा महापूर महाडकरांच्या आठवणीत असतानाच काल पुन्हा एकदा धोक्याच्या घंटेचा स्वर महाडकरांच्या कानी आला आणि पुन्हा एकदा महाडकरांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं. मात्र आज सकाळी पावसाने दडी मारल्यामुळे सावित्री नदीची पाणी पातळी आटोक्यात आली आणि पुन्हा एकदा महाडकारांनी सुटकेचा निःश्वास सोडला पाहुयात याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील स्थानिकांशी बातचीत केली आहे. 

Amravati News : अमरावती जिल्ह्यात अजितदादांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमानं साजरा

Amravati News : राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशन आणि महात्मे आय बँक आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी वाठोडा शुक्लेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात 65 दिवे प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात 2200 स्त्री पुरुषांनी लाभ घेतला. महाराष्ट्र शासनाच्या 'माझी लाडकी बहिण योजने' अंतर्गत 510 महिलाचें अर्ज स्वीकृत करण्यात आले. परिसरातील 460 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. 290 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिये करीता निवड करण्यात आली. 650 जेष्ठ नागरिकांचा वृक्ष आणि शाल देवुन सत्कार करण्यात आला.

Nanded Politicle Updates : काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी घेतली भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट

Nanded Politicle Updates : नांदेड जिल्ह्यातील  देगलूर  मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर हे आता भाजपच्या गोटात दिसून आले..  भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतल्यानंतर आता त्यांनी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत  भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. दोघांची भेट घेण्याअगोदर आमदार अंतापुरकर यांनी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. आता या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत अंतापूरकर यांनी काँग्रेसचा प्रचार केला नाही. शिवाय राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीत त्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप आहे . दरम्यान  अंतापूरकर लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा नांदेड जिल्हात आहे.

Ahmednagar News: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावं आणि सगेसोयऱ्यांबाबत सरकारनं त्वरित निर्णय घ्यावा यासाठी गेल्या तीन दिवसांपासून अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ द्यायला हवा आतापर्यंतच्या आकड्यांवरून मराठा बांधवांना 80 टक्के  आरक्षण मिळाले आहे 20 टक्क्यांसाठी सरकारला थोडीही उसंत मिळू नये म्हणून हा प्रयत्न सुरू आहे  का ? असा असावा उपस्थित करत या मागे  काही वेगळं काही आहे का याची शंका ही आमच्या मनात उपस्थित होत असल्याचं कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

Maharashtra Politics: माकपचे माजी आमदार नरसाय्या आडम मुंबईत उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर

Maharashtra Politics : माकपचे माजी आमदार नरसाय्या आडम हे मुंबईत उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले आहेत. मातोश्री येथे आडम हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. सोलापूर मध्यची जागा ही महाविकास आघाडीतून माकपला सोडावी यासाठी आडम हे मागील काही दिवसापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेतयात. या आधी त्यांनी शरद पवार, नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीचे ही हेच कारण असण्याची शक्यता आहे. 

Bhandara Rains : भंडाराच्या आसगावमध्ये पूरपरिस्थिती; 90 टक्के घरांना पाण्याचा वेढा

Bhandara Rains : भंडारा जिल्ह्यात मध्यरात्री सुमारे तीस मुसळधार पावसाने हजेरी लावली. याचा सर्वाधिक फटका पवनी आणि लाखांदूर तालुक्याला बसलेला आहे. पवनी तालुक्यातील आसगाव आणि लाखांदूर तालुक्यातील ओपारा या गावांना अक्षरशः पाण्यानं वेढलेला आहे. या दोन्ही गावांमध्ये पूर परिस्थितीजन्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं इथे प्रशासनाकडून मदतकार्य करण्यात येत आहेत.

Nashik News : नाशिक इगतपुरी तालुक्यातील भावली धबधब्यावर पर्यटकांना वीकेंडला जाण्यास बंदी

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात निसर्गरम्य वातावरणात फिरण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. भावली धरण धबधबा आणि इगतपुरीच्या पहिने धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्यामुळे हुल्लडबाज पर्यटकांमुळे अपघात होण्याच्या शक्यता असताना आता नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. इगतपुरी येथील पोलीस बंदोबस्तात तपासणी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 90 जणांवर कारवाई करत 73 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. इगतपुरीच्या भावली धबधब्याशेजारी आणि त्र्यंबकेश्वरच्या  पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी काल पासून विकेंडला पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदीचा निर्णय घेतला आहे.

Sangli Rains : वाळवा तालुक्याच्या रेठरे धरण तलावाजवळचा धबधबा ओसंडून वाहू लागला

Sangli Rains : सांगलीच्या शिराळा आणि  वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्यातील धरणे भरली आहेत. दुसरीकडे वाळवा तालुक्याच्या रेठरे धरण तलावा जवळचा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.या भागातील ओढे नाले देखील तुडूंब भरून वाहू लागलेत. यामुळे अनेक शेतामध्ये पाणी देखील शिरले आहे. 

Sangli News : चांदोली धरण परिसरात 24 तासात 148 मिलिमीटर ढगफुटीसदृश्य पाऊस

Sangli News : सांगलीतील शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. त्यामुळे चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये 148 मिलिमीटर पाऊस पडलाय. चांदोली पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून धरणात 27 हजार 557 क्युसेक पाण्याची आवक सुरूच आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 1625 मिलिमीटर इतका पाऊस पडलाय. त्यामुळे चांदोली धरणात 26.81 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण आता 78 टक्के भरलेय. चांदोली धरणातून सध्या 1 हजार 995 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास धरणातून विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. दरम्यान  वारणा धरणातून येत्या चौवीस तासात वक्र द्वाराद्वारे केव्हाही पाणी सोडले जाऊ शकते.  त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर  नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा वारणा धरण व्यवस्थापनकडून देण्यात आलाय.  वारणा धरणाच्या पाणलोट  क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ  होत आहे. 

Kalyan Railway : कल्याण स्टेशन जवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड, कल्याणजवळ लोकल खोळंबल्या

Kalyan Railway : कल्याण स्टेशन जवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. कल्याणजवळ लोकल थांबवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबई आणि कर्जत कसाराकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत.

Dhule News : धुळे: शिंदखेडा तालुक्यात एका महिन्यात 400 मिलिमीटर पावसाची नोंद; पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान

Dhule News : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात गेल्या वर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते तर यंदा गेल्या एक महिन्यापासून होत असलेल्या दमदार पावसामुळे शिंदखेडा तालुक्यातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे यामुळे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असून शिंदखेडा तालुक्यात एका महिन्यात तब्बल 400 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे तर गेल्या वर्षी जुलै महिन्यात शंभर मिलिमीटर च्या आतच पाऊस झाला होता, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे, शिंदखेडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले होते तर यंदा अतिवृष्टीमुळे पिके सडून जाऊ लागली आहेत, यामुळे पुढील काही दिवसात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची देखील वेळ येऊ शकते. या पार्श्वभूमीवर शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

Maharashtra Politics : मनसेची विधानसभा निवडणुकीची तयारीला वेग; आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे निरीक्षक अहवाल सादर करणार

Maharashtra Politics : मनसेची विधानसभा निवडणुकीची तयारीला वेग 


आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे निरीक्षक अहवाल सादर करणार


प्रत्येक जिल्हा निहाय मनसेच्या निरीक्षकांनी घेतला होता विधानसभेचा आढावा 


या अहवालांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आज आढावा  


मनसेचे नेते , सरचिटणीस आणि उपाध्यक्ष यांना निरीक्षक म्हणुन नेमण्यात आले होते

Nandurbar News : शहादा शहरात बसवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक

Nandurbar News : शहादा शहरात बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली, नाशिकहून शाळेच्या दिशेने येणाऱ्या बसवर रात्री अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर शिवतीर्थ ते सप्तशृंगी माता मंदिर परिसरात दगडफेक झाली आहे. या दगडफेकीत सुदैवाने या घटना कुठलीही जीवित आणि घडली नाही आहे. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधान बस कुठेही न थांबता सरळ आगारात घेऊन गेले मात्र बस मोठं नुकसान झालं असून घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यां कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात शांतता आहे मात्र ही घटना कशामुळे झाली याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

Palghar Rain : पालघर जिल्ह्यात सलग चार दिवस पावसाची दमदार हजेरी

Palghar Rain : पालघर : पालघर जिल्ह्यात पावसाने सलग चार दिवस दमदार हजेरी लावली आज पाचव्या दिवशीही पावसाची रिमझिम सुरूच असून काल डहाणू शहरामध्ये सर्वाधिक 315 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर तलासरी तालुक्याला ही पावसाने झोडपून काढलं. तर तलासरी तालुक्यातील कोमगाव येथून वाहणाऱ्या गावघात नदीला पूर आल्यामुळे यापुरामध्ये एक महिला वाहून येऊन खजुरी आणि खडक याला अडकून तिचा मृत्यू झाला रात्री उशिरा हा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं. तर जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्याने भातशेतीच्या लावण्यांना वेग आला असून जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या सूर्या आणि वैतरणा नद्यांनाही मोठा पूर आहे तर दुसरीकडे सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 58 टक्के भरलं असून जिल्ह्यातील इतर लहान धरण ही 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत.

Raigad Rain Updates : अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात पावसाचे दोन बळी; गुरे चारण्यासाठी गेलेल्या बालाजी नारायण उतेकर यांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू

Raigad Rain Updates : महाड (Mahad) तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसात दोघांचा बुडून मृत्यु झाल्याची  घटना समोर आली आहे. तालुक्यातील वाळन खुर्द गावातील शेतकरी बालाजी नारायण उतेकर हे गुरे चरविण्यासाठी शेतात गेले असता एका डोहात बुडाले  तर  दूसरीकडे अंकित महामुनकर या 24 वर्षीय तरूणाचा देखील आपल्या मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेल असतां एका डोहात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे .या घटनांमुळे परीसरात शोक व्यक्त होतोय. काल संध्याकाळी या घटना घडल्या असुन परीसरात या घटनांमुळे शोक व्यक्त होत आहे.

Actress Jasmin Bhasin In Pain Due To Corneal Damage: कॉन्टॅक्ट लेन्समुळे अभिनेत्रीला प्रचंड वेदना, दिसणंही झालेलं बंद

Actress Jasmin Bhasin In Pain Due To Corneal Damage:  अभिनेत्री जास्मिन भसीन हिला कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्याचा फटका बसला. कार्यक्रमात तिने लेन्स वापरल्यानंतर तिच्या डोळ्यांमध्ये प्रचंड वेदना झाल्या आणि तिला दिसणे बंद झाले होते. जास्मिनने सांगितले की, दिल्लीत एका कार्यक्रमात उपस्थित होती. त्यावेळी तिने कॉन्टॅक्ट लेन्स लावल्या. काही वेळाने तिला प्रचंड वेदना सुरू झाल्या. त्यानंतर ती मुंबईला पोहोचली. तेथे डॉक्टरांनी सांगितले की, लेन्समुळे कॉर्नियावर परिणाम झाला आहे. डॉक्टरांनी तिला ४-५ दिवसांमध्ये ठिक होणार असल्याचे सांगितले. तोपर्यंतचा काळ खूप कठीण असून, त्यानंतरही डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल, असे जास्मिनने सांगितले

Raigad Rain Updates: रायगडमध्ये पावसाची कोसळधार; महाड, पोलादपूर, रोहा शहरांतील नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना

Raigad Rain Updates : कालपासून कोसळत असलेला मुसळधार पावसाचा जोर रायगडमध्ये आज कमी झालेला पहायला मिळतोय. मात्र नद्यांच्या पातळीत वाढ कायम आहे. महाडमधील सावित्री नदी आणि रोहामधील कुंडलिका नदी या नद्या इशारा पातळीपर्यंत अद्याप ठाम असून पावसाचा पुनः जोरदार आगमन झाल्यास या नद्या आपली धोका पातळी पुन्हा ओलांडू शकतात, असं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाड, पोलादपूर, रोहा शहरांतील नागरीकांना सतर्क राहण्यास प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे एनडीआरएफचे जवान देखील या भागांत लक्ष ठेऊन आहेत.

Kalyan Rain Updates : कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुडघाभर पाणी

Kalyan Rain Updates : कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुडघाभर पाणी साचलं आहे. गुरुदेव हॉटेल ते शिवाजी महाराज चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. 

Mumbai Rain Updates : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संतधार; मध्यरात्री विश्रांती घेतल्यानंतर पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरू

Mumbai Rain Updates : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संतधार 


मध्यरात्री विश्रांती घेतल्यानंतर पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरु आहे 


मुंबईत काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी उपनगरात मध्यम पाऊस अधून मधून पाहायला मिळतोय 


सध्या मुंबईत सखल भागात कुठेही पावसाचं पाणी साचले नाही 


पाऊस असल्याने रस्ते वाहतूक नेहमीप्रमाणे संथ गतीने आहे 


काल हवामान विभागाने मुंबई मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता

Amit Shah on Sharad Pawar And Uddhav Thackrey : देशातले भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार शरद पवार : अमित शाह

Amit Shah on Sharad Pawar And Uddhav Thackrey : पुण्यातल्या भाजपच्या मेळाव्यातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. या देशातले भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार शरद पवार आहेत अशी टीका शाहांनी केली आहे. शरद पवारांनीच देशात भ्रष्टाचार रुजवला, त्याला संस्थात्मक रुप दिलं असंही शाह म्हणाले आहेत.


उद्धव ठाकरेंवरही अमित शाहांनी जोरदार टीका केली.. या देशात औरंगजेब फ्लॅन क्लब आहे. आणि त्या क्लबचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत असं अमित शाह म्हणाले आहेत. पुण्यातल्या बालेवाडीतून आज भाजपनं विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं..

Devendra Fadnavis On Ajit Pawar : राजकारणात कधी तह तर कधी सलगी करावे लागते : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis On Maratha Reservation: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंना थेट आव्हान दिलं. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण का द्यावं हे या तिघा नेत्यांनी सांगावं, असं फडणवीस म्हणाले.


राजकारणात कधी तह तर कधी सलगी करावे लागते, असं म्हणत अजित पवारांना सत्तेत सहभागी केल्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी महत्त्वाचा सल्ला दिला. विरोधकांना बिनधास्त ठोकून काढा, त्यासाठी आदेशाची वाट पाहत बसू नका, असंही ते म्हणाले. भाजपचं महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पुण्यात पार पडतंय, त्यात फडणवीस बोलत होते. 

Ratnagiri Rain Updates : रत्नागिरीत जगबुडी, नारंगी नदीला पूर; पुरामुळे गावातील रस्ते पाण्याखाली

Ratnagiri Rain Updates : रत्नागिरीत जगबुडी, नारंगी नदीला पूर

पुरामुळे गावातील रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे खेडमध्ये खाडीपट्ट्यातील चाळीस गावांचा संपर्क तुटला

Ratnagiri News Updates : रत्नागिरी जिल्ह्यातल्या काजळी नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटलाय

Ratnagiri News Updates : रत्नागिरी जिल्ह्यातल्या काजळी नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या भातशेतीमध्ये पाणी शिरलंय. सोमेश्वर, हातीस, चिंचखरी या गावांचा संपर्क तुटलाय. आणखी काही तास पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे.
तिकडे मुसळधार पावसामुळं चिपळूण-गुहागर मार्गावर पाणी आलं. त्यामुळं मिरजोळी भागातली वाहतूक ठप्प झाली.. डोंगरातून येणारं पावसाचं पाणी थेट रस्त्यावर आल्यानं याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

Ratnagiri News Updates : रत्नागिरीत मुसळधार पाऊस, पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

Ratnagiri News Updates : रत्नागिरीत मुसळधार पाऊस, पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी ब्रिज वरील वाहतूक थांबवली 

मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी ब्रिज ब्रिटिश कालीन 

काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सुरक्षितता म्हणून वाहतूक थांबवली

Mumbai Rain Updates : मुंबई, ठाण्यात आज 200 मिमी पावसाचा अंदाज

Mumbai Rain Updates : मुंबई, ठाण्यात आज 200 मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

मुंबईसह उपनगर, ठाण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. 

संध्याकाळनंतर पावसाचा जोर कमी होणार, हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 22nd July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. मुंबईत आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीर, काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता


2. पालघर जिल्ह्याला आजपासून तीन दिवस यलो अलर्ट, गेले चार दिवस जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून सूर्या आणि वैतरणा नद्यांना पूर. धामणी धरण 53टक्के भरले


3. रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांचे आदेश


4. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरु ठेवा, नादुरुस्त किंवा धोकादायक इमारतींमध्ये शाळा भरु नये, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना


5. नागपूरमध्ये पावसाचा जोर कायम, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.