मुंबई : बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार असल्याची बातमी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी दिली आहे. या काळात परीक्षा या सकाळी 11 ऐवजी साडे 10 वाजता सुरू होणार असल्याचंही स्पष्ट झालंय.


ऑनलाइन परीक्षा घेण्याबाबत खूप विचार केला गेला पण दुर्गम भागात ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण आहे असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी स्पष्ट केलं. 80 मार्कच्या पेपरसाठी साडे तीन तास वेळ मिळणार आहे, म्हणजे पेपर सकाळी साडे 10 वाजता सुरू होणार असून ती दुपारी 2 वाजेपर्यत असेल. 40 आणि 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढ मिळणार आहे. दिव्यांगांसाठी सगळ्या पेपरना अतिरिक्त एक तासाची वाढीव वेळ देण्यात येणार आहे. तर प्रॅक्टिकलच्या परीक्षा गृहपाठ पद्धतीने होणार आहेत. राज्यात दहावीसाठी सुमारे 17 लाख विद्यार्थी तर बारावीसाठी सुमारे 13 लाख विद्यार्थी बसले आहेत. 


एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जून महिन्यामध्ये करण्यात येईल. 


परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट मध्ये घेण्यात येईल. सदरची परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.


SSC and HSC board exam | दहावी, बारावी बोर्डाचे अंतिम वेळापत्रक जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक


सुरक्षात्मक उपाय योजना 
परीक्षेसंदर्भात शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबी साठी स्वतंत्र सूचना देण्यात येतील. कोविड-19 बाबत केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील. राज्यमंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजण्यात यावी असं आवाहन सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना करण्यात आलं आहे. 


दहावीच्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जात असत परंतु या वर्षी कोविड -19 परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य ( Assignment ) गृहपाठ पध्दतीने घेण्यात येतील. प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पध्दतीने 21 मे ते 10 जून या कालावधीत सादर करण्यात यावेत असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


बारावीच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा या 22 मे ते 10 जून या कालावधीत होतील. कोविड-19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे 12 वी च्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून 5 ते 6 प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल. कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परिक्षेनंतर 15 दिवसात Assignment सादर करावेत. 


दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी मध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषय परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा Assignment सादर करण्यासा 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल असं बोर्डाने आपल्या निवेदनात सांगितलं आहे.


उद्या MPSCची परीक्षा देताय! ही खबरदारी नक्की घ्या, आयोगाकडून सूचना