मुंबई : खूप दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी फायनली भाजपला रामराम ठोकला आहे. खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.  दरम्यान खडसे यांच्या भाजप सोडण्याने भाजप नेत्यांना धक्का बसला आहे. ही धक्कादायक बातमी असून ही पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे, असं आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तर खडसेंचा हा निर्णय दुर्देवी असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय. तर मी यावर लगेचच प्रतिक्रिया देऊ शकणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.


एकनाथ खडसे यांनी आज सकाळी पक्षाचा राजीनामा दिला अशी माहिती मिळाली. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही, असं जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना त्यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली, असंही पाटील यांनी नमूद केलं.

'ओ जानेवाले हो सके तो लौट के आना'- मुनगंटीवार
माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, एकनाथ खडसेंनी भाजप सोडणं ही धक्कादायक बातमी आहे. ही पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे. खडसेंसारखा नेता ज्यांनी पक्षाची सेवा केली. मी निशब्द आहे. त्यांनी जाऊ नये असं वाटायचं, असं ते म्हणाले. 'ओ जानेवाले हो सके तो लौट के आना' असं म्हणत मुनगंटीवार यांनी ज्यांनी संघटनेवर प्रेम केलं. पक्ष वाढवला. त्यांचं जाणं नक्कीच जाणं चांगलं नाही, असं म्हटलं आहे. पक्षात अन्याय होतोय असं त्यांना वाटलं. पण मला वाटायचं की चर्चेतून होईल, हे धक्कादायक आहे. खूश रहो तुम सदा ये दुवा है हमारी. अन्याय झाला की नाही यावर चर्चेतून, संवादातून मार्ग निघू शकला असता. एकनाथ  खडसे हे संघर्षशील, दिलदार मनाचे नेते आहेत, असं मुनगंटीवार म्हणाले.


दिल्या घरी सुखी राहावे - रावसाहेब दानवे
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की, एकनाथ खडसेंचा हा दुर्देवी निर्णय आहे. त्यांचं राजकीय करिअर भाजपमध्ये घडलं. काही कारणांनी ते मुख्य प्रवाहातून बाहेर गेले. ते जिकडे जात आहेत, त्या लोकांनीही त्यांच्यावर टीका केल्या आहेत. काही काळ त्यांनी वाट पाहायला हवी होती. त्यांच्याविषयी आदर आहेत. त्यांनी दिल्या घरी सुखी राहावे. त्यांना आम्ही वेगळं समजत नव्हतो. आम्ही चिंतन नेहमीच करतो. देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव सर्वांना माहिती आहे. आमच्यात मनभेद नव्हते, मतभेद होते. मतभेद सर्वच पक्षात असतात. राजकारणात अशा घटना घडत असतात. खडसे आणि फडणवीस हे चांगले मित्र होते. आमच्यात बिनसलं काही नव्हतं, असं दानवे म्हणाले.  आम्ही खूप प्रयत्न केले की त्यांनी पक्षांतर करु नये. त्यांनी पक्षासाठी खूप केलं. पक्षानही त्यांना खूप दिलं, असंही दानवे म्हणाले.


एकनाथ खडसेंचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांना मिळाला : केशव उपाध्ये
एकनाथ खडसे यांचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्षांना मिळाला आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं. नाथाभाऊ जाऊ नये यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न केले. संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. खडसेंवर अन्याय झाला की नाही हा विषय व्यक्तिसापेक्ष आहे, असंही ते म्हणाले.


अधिकृत माहिती मिळालेली नाही : देवेंद्र फडणवीस
अधिकृत माहिती मिळालेली नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली.


राष्ट्रवादी प्रवेशानंतर नाथाभाऊ लगेच मंत्री होण्याची शक्यता
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी राष्ट्रवादीचा एक मंत्री राजीनामा देईल, त्या जागी एकनाथ खडसे मंत्री होती. तर जो मंत्री राजीनामा देईल तो प्रदेशाध्यक्ष होईल, असं म्हटलं जात आहे. दिलीप वळसे-पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांच्यापैकी एखादा मंत्री राजीनामा देणार असल्याची प्राथमिक शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.



महत्त्वाच्या बातम्या :