Maharashtra Political Crisis : विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीत ठाकरेंच्या शिवसेनेला (Shiv Sena Uddhav Thackeray) स्थान मिळालं नाही. शिंदे गटाच्या (Eknath Shinde Shivsena) सदस्यांना या समितीत स्थान मिळालं आहे. त्यामुळे शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे. या नियुक्त्या करताना नियमानुसारच करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेकडून दोन वेगळे गट आहे असा कोणी दावा केलेला नाही. त्यामुळे दोन वेगवेगळ्या नेत्यांचं कसं ऐकलं जाईल. ज्यांना समितीत संधी मिळालेली नाही त्यांनीही दावा केलेला नाही, असं नार्वेकरांनी म्हटलं आहे. 


राहुल नार्वेकर म्हणाले की, जे कामकाज होत आहे ते नियमानुसार होत आहे. BAC नियमानुसारच गठित झाली.  पक्षाच्या ताकदीनुसार त्यांचे प्रतिनिधी नेमण्यात येतात. शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्याकडून नाव मागवली.  त्यामुळे काही घटनाबाह्य नाही.  प्रथा परंपरेनुसार हा निर्णय झाला आहे, असं नार्वेकर म्हणाले. नार्वेकर म्हणाले की, माझ्यासमोर कोणी दावा केला नाही की वेगळा गट आहे. त्यामुळे माझ्यासमोर शिवसेना विधिमंडळ एक दिसत आहे. 


नार्वेकर म्हणाले की, काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. विधिमंडल त्याचं काम करत. विधीमंडळ कामकाजामध्ये कोर्ट हस्तक्षेप करत नाही.  न्यायालय विधिमंडळ कामकाजाला स्थगिती देऊ शकत नाही. अजूनही कसली स्थगिती नाही. कोणतंही नियमबाह्य काम केलं नाही.  गटनेता कोण हे आम्ही ठरवत नाही.  गटनेता कोण हे आम्हाला कळवले जातं, असं नार्वेकर म्हणाले. अजय चौधरी यांच्या पत्राबाबत नार्वेकर म्हणाले की, नियमानुसार विधिमंडळ गट नेते एकनाथ शिंदे यांनी 3 जुलै 2022 ला पत्र दिले. त्यांनी उल्लेख केला गट नेता स्वतः ते आहे. नियमानुसार शिंदे यांचे पत्र ग्राह्य आहे, असं नार्वेकर म्हणाले.


ठाकरे गटाच्या वतीने विधानसभा अध्यक्षांना पत्र


विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीवर सुनिल प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक करा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीवर सदस्यांची नेमणूक करताना शिंदे गटाला झुकतं माप देत ठाकरे गटाला डावलल्याचं स्पष्ट झालं असून त्या संबंधित आता ठाकरे गटाच्या वतीने विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं गेलं आहे.  या आधी कामकाज सल्लागार समितीवर सदस्यांची नेमणूक करण्यासाठी ठाकरे गटाला विधानसभा अध्यक्षांकडून पत्र देण्यात आलं नव्हतं. त्यावर शिवसेना हा अधिकृत पक्ष असून या समितीच्या सदस्यांची नेमणूक करण्यासाठी आपल्याला निमंत्रण देण्यात यावं अशा आशयाचं एक पत्र देण्यात आलं होतं. पण या पत्राला विधानसभा अध्यक्षांनी केराची टोपली दाखवत शिंदे गटाच्या उदय सामंत आणि दादा भुसे यांची कामकाज सल्लागार समितीवर नियुक्ती केली होती. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. महत्त्वाचं म्हणजे विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर शिवसेनेच्या अंबादास दानवेंची निवड करण्यात आली आहे. पण विधानसभेमध्ये मात्र वेगळा निर्णय घेण्यात आला. 


शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यानी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिलं आहे. आता या संबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.