Sanjay Raut on Amit Shah नागपूर :  उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या डिग्री वरून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे कुठलीही डिग्री नसताना ते देशाच्या सर्वोच्च पदावर बसले आहेत. तर त्यांच्या खालोखाल अमित शहा यांच्याकडेही डिग्री नसताना ते दुसऱ्या स्थानी देशाचे गृहमंत्री म्हणून विराजमान आहेत. डिग्री नसताना रोजगार मिळणारा व्यवसाय म्हणजेचं राजकारण असेही खासदार संजय राऊत म्हणाले.


आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संजय राऊत हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. दक्षिण नागपूर (Nagpur News) मतदारसंघात स्थानिक नेते प्रमोद मानमोडे यांच्यातर्फे रोजगार मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर निशाणा साधत खिल्ली उडवली आहे.


डिग्री नसताना रोजगार मिळणारा व्यवसाय म्हणजे राजकारण 


पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत होते ते अजिंक्य आहेत, विष्णूचा ते 13वे अवतार आहेत, अशा अविर्भावात ते जगत होते. तसेच रशियाच्या पुतीन प्रमाणे त्यांना सत्ता हातात ठेवायची होती. मात्र विदर्भ आणि महाराष्ट्राच्या जनतेने मोदींचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत नागपूरच्या लोकांनी वैयक्तिक प्रेमापोटी नितीन गडकरी यांना निवडून आणलं. मात्र, ते देखील थोडक्यात बचावले. आज देशात वरपासून खालपर्यंत चोरांचेच राज्य आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे चित्र काहीसे बदलले असून विधानसभेच्या निवडणुकीत देखील हे संपूर्ण चित्र पलटणार, असा विश्वासही संजय राऊत यांनी बोलताना व्यक्त केलाय.


मी मेलो तरी चालेल पण मी शिवसेना सोडणार नाही- संजय राऊत 


आज एका मतदारसंघाच्या अनुषंगाने नागपूर सारख्या शहरात किती बेरोजगारी आहे, हे प्रकर्षाने दिसून आले आहेत. जी परिस्थिती एका मतदारसंघाची आहे तीच संपूर्ण देशाची आहे. महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले आहेत. याबाबत कोणी ओरड केली तर त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. असा प्रयत्न माझ्यावर देखील झाला आहे. मला खोट्या आरोपांखाली तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न या भाजप सरकारने केला आहे. मात्र मी मेलो तरी चालेल पण मी शिवसेना सोडणार नाही, असा निर्धारही संजय राऊत यांनी बोलताना व्यक्त केलाय. 


शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने आज नागपुरातील दक्षिण विधानसभा मतदारसंघात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार संजय राऊत यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजप आणि सरकारवर घनाघाती टीका केली आहे.


हे ही वाचा