Maharashtra Politics अमरावती : सरकारकडे आमच्या 18 प्रमुख मागण्या आहेत. त्या जर पूर्ण झाल्या तर आम्ही निवडणूकच लढणार नाही, असे मोठे वक्तव्य प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलंय. सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर ठीक, अन्यथा आम्ही शेतकरी, शेतमजुरांची ताकद महाराष्ट्राला दाखवू.असा इशाराही  त्यांनी दिलाय. आम्ही जातीय समीकरणे जोडून एकत्र येणार नाही. राजू शेट्टी (Raju Shetty), मनोज जरांगे (Manoj Jarange Patil),  एमआयएम (MIM) सोबत आमचे जे मुद्दे आहेत त्यावरच एकत्र बसू.  अन्यथा आम्ही बसणार नाही. तर वेळ आली तर एकटे लढू. मात्र मुद्द्यांवर ज्या ज्या पक्षाचं एक मत होईल त्यांच्यासोबत आम्ही लढणार असल्याचेही बच्चू कडू म्हणाले. ते अमरावती येथे बोलत होते. 


आम्ही किमान 20 ते 25 जागांवर लढू- बच्चू कडू


आमचे मुद्दे हे सर्व जातीमधील शेतकरी कष्टकरी मजुरांचे आहेत. आम्ही इतके मोठे नाही की प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊ किंवा त्यांच्यासोबत जाऊ. तो त्यांचा विषय आहे. सरकारने निर्णय घेतला तर ठीक अन्यथा आम्ही शेतकरी शेतमजुरांची ताकद महाराष्ट्राला दाखवू. आम्ही किमान 20 ते 25 जागांवर लढू आणि जिथे जिथे चांगले उमेदवार मिळत आहेत तिथे आम्ही पुढे जाऊ. आमचा मूळ मुद्दा आहे तो शेतकऱ्यांचा. त्या मुद्द्यावर जर सर्व एकत्र आले तर आम्ही नक्कीच सोबत राहू, अन्यथा नाही. असेही बच्चू कडू म्हणाले. 


भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवू - बच्चू कडू 


सध्याघडीला देशात मोठा प्रश्न आर्थिक विषमतेचा आहे. काम करणार्‍याला कमी पैसे आणि एजन्टला जास्त पैसे मिळतात. काम न करणार्‍यासाठी शासन आहे का, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. तर दुसरीकडे शासन लेक लाडकी योजना जाहीर करते आहे. कष्ट करणाऱ्याला पैसे दिले पाहिजेत. पैसे नसतील तर त्यांना सल्ला आहे. तर दुसरीकडे गर्व्हनरचा बंगला चाळीस एकर वर आहे. अशा परिस्थितीत तो विका त्याचे एक लाखभर कोटी येतील, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला. ज्या पारशी लोकांनी अत्याचार केले. त्यांच्याकडे कोट्यावधीची प्रॉपर्टी मुंबईत आहे. कष्ट करणार्‍याचे मूल्य जपले पाहिजे. दिव्यांग, कष्टकरी यांचा बजेटमध्ये किती वाटा आहे, हे आम्ही विचारतोय. श्रीमंत अधिक श्रीमंत होण्याचे मार्ग आम्ही तोडतोय. तर येत्या 9 ऑगस्टला संभाजीनगर मध्ये भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवू आणि त्यानंतर  मग अंतिम निर्णय घेऊ, असेही बच्चू कडू म्हणाले.


हे ही वाचा