Agriculture  News : पेरणीच्या हंगामात अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणेच्या बाबतीत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केली आहे. अकोल्यातील दैनिक लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलतांना कृषीमंत्री सत्तार यांनी ही घोषणा केली आहे. 


दरम्यान यावेळो बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, ज्यांच्याकडे बोगस बियाणे असतील, ज्यांच्याकडे बोगस औषधे असतील, किंवा खते असतील त्यांनी तत्काळ नष्ट करावे. अन्यथा राज्यपाल यांच्याकडे मी पूर्ण रिपोर्ट देणार असून, त्यांच्यावर अंतिम निर्णय झाल्यावर त्या बोगस माल विकणाऱ्यांवर किमान 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा येत्या अधिवेशनात आणला जाणार असल्याचे सत्तार म्हणाले आहेत. 


आमचे अधिकारी पैसे घेत असल्याचे बातम्या आल्या


शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी एक दिवस बळीराजासाठी आम्ही उपक्रम राबवला. ज्यात राज्यातील 16 हजार शासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची अडचण समजून घेतली. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो याचा अभ्यास केला. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आम्ही खरीप हंगामाची आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी अकोला, जालना, परभणी जिल्ह्यातील आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांनी 87 ठिकाणी छापेमारी केली, ज्यात 68 ठिकाणी अनियमितता आढळून आली. तर काही ठिकाणी आमचे अधिकारी पैसे घेत असल्याचे बातम्या आल्या. मी पोलिसांना फोन करून कारवाईत सहभागी होण्याच्या सूचना दिल्या. तसेच आमच्या कोणत्याही अधिकाऱ्याने पैसे घेतले असल्याचे आढळून आल्यास त्याची तक्रार जिल्हाधिकारी किंवा एसबीकडे करावी असेही सत्तार म्हणाले. 


दोन महिन्यासाठी विशेष पथक तयार करावा...


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून एक प्रस्ताव राज्यपाल यांच्याकडे घेऊन जाणार आहे. पोलीस, महसूल आणि कृषी विभाग या तिघांचा दोन महिन्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आला पाहिजे. यामुळे बोगसगिरी करणारे सर्व समोर येतील. मी कृषीमंत्री किती दिवस राहिल माहित नाही. पण मंत्री असून देखील आपण काहीच केले नाहीतर शेतकरी आपल्याला माफ करणार नाही, असेही सत्तार म्हणाले. 


हे ही वाचा :


अकोल्यात कृषीमंत्र्यांच्या नावावर कथित पथकाची धाड, कृषीमंत्री सत्तारांच्या स्वीय सहाय्यकाचा पथकात समावेश