रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अखेर कोकण रेल्वे धावणार आहे. मागील काही दिवसांपासून कोकणवासियांकरता कोकण रेल्वे सोडण्याच्या बातम्या येत होत्या. निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल चारमान्यांकडून नाराजी देखील व्यक्त केली जात होती. नेमका निर्णय कधी होणार? किती ट्रेन्स सुटणार? नियम काय असणार? याबाबतचं घोंगडं भिजत ठेवलेले होते. पण, अखेर कोकणात गणेशोत्सवासाठी रेल्वे सोडण्याचा निर्णय झाला आहे. उद्या अर्थात 15 ऑगस्टपासून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी, चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला आहे.


राज्य आणि केंद्र सरकारकडून याबाबत हिरवा कंदिल मिळाल्यानंतर या रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात अप आणि डाऊन अशा 162 गाड्या सोडण्यात येणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक देखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पहिली रेल्वे सुटणार आहे. शिवाय काही गाड्या या लोकमान्य टिळक टर्मिनस अर्थात कुर्लावरून देखील सुटणार आहेत.



काय असणार नियम?

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता ट्रेन्सनं प्रवास करण्याकरता काय नियम असणार याबाबत देखील उत्सुकता आहे. दरम्यान, अद्याप याबाबतची नियमावली समोर आलेली नाही. पण, मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक स्टेशनवर जिल्हा प्रशासनाचे काही कर्मचारी असणार असून ते येणाऱ्या प्रवाशांची माहिती किंवा त्यांची नोंद ठेवणार आहे.


अखेर निर्णय झाला

कोकण रेल्वेे सोडण्याबाबत निर्णय होत नव्हता. यावरून राजकीय आरोप - प्रत्यारोप देखील झाले होते. शिवाय, चाकरमान्यांकडून देखील नाराजी व्यक्त केली जात होती. राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळत नसल्याची माहिती देखील समोर येत होती. अखेर याबाबतचा निर्णय झाला असून 15 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावर 5 सप्टेंबरपर्यंत ट्रेन्स धावणार आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :