Nagpur Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) उपराजधानी नागपूरात (Nagpur) फक्त 54 टक्के मतदान झालं, म्हणजेच 46 टक्के नागपुरकरांनी आपले मतदानाचं कर्तव्य बजावलच नाही. हे ऐकून नागपूरकर किती बेजबाबदार आहेत, असंच कोणालाही वाटेल. मात्र नागपूरात कमी मतदानामागे मतदारांची अनास्था हेच एकमेव कारण नव्हते, तर मतदारयाद्यांमधील प्रचंड घोळ, राजकीय पक्षांचं दुर्लक्ष आणि प्रशासनाची (Election Commission Voter List) घोडचूक इत्यादि अनेक कारणं देखील कारणीभूत असल्याचे मत आता समोर येऊ लागले आहे. नागपूर प्रशासनाने  75 टक्क्यांपर्यंत मतदान वाढवू, असा गाजावाजा केला. त्यासाठी कसोशीचे प्रयत्न देखील केले. मात्र प्रत्यक्षात नागपुरात फक्त 54 टक्केच मतदान होऊ शकले.


परिणामी, आगामी विधानसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीत राहिलेल्या त्रुटी दूर केल्या करून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न नागपूर प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नागपुरातील 200 पेक्षा जास्त फ्लॅट्स असलेल्या टाऊनशिपमध्ये विशेष मतदान केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिली आहे. त्यासाठी त्या टाऊनशिपच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.


शहरातील मोठ्या फ्लॅट स्कीममध्येच मतदान केंद्र 


लोकसभा निवडणुकीत नागपूर शहरातील काही मतदार केंद्रावर 1,400 तर काही मतदान केंद्रावर फक्त 400 मतदारांची नोंद होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांची सारखी मतदार संख्या करण्याचा ही प्रयत्न राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर  यावेळी म्हणाले.  शहरातील मोठ्या फ्लॅट स्कीममध्येच मतदान केंद्र देण्याचा आमचा  प्रयत्न असून, यासाठी संबंधित फ्लॅटमधील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांसोबत आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतला जाईल असेही इटनकर  यावेळी म्हणाले. 


नवीन मतदारांनी नोंदणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन


नागपूर प्रशासनाने गेल्या निवडणुकीत  75 टक्क्यांपर्यंत मतदान वाढवू, असा गाजावाजा केला होता. मात्र प्रत्यक्षात नागपुरात फक्त 54 टक्केच मतदान होऊ शकले. त्यानंतर भाजपसह अनेक पक्षानी कमी मतदानासाठी मतदार याद्यांमधील गोंधळ जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तर प्रशासनानं बचावात्मक पवित्रा घेत मतदार यादीत वारंवार होणाऱ्या दुरुस्त्यासंदर्भात नागरिकांची उदासीनता कारणीभूत असल्याचा मुद्दा पुढे केला होता. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपसह इतर पक्षानी मतदार याद्यांचा घोळ न्यायालयाच्या दारात नेण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने आता प्रशासन सतर्कता बाळगतान दिसत आहे. सध्या बीएलओ घरोघरी जात असून मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहे.  ज्यांची नावे चुकीचे अथवा  डिलीट झाली, त्यांची पुन्हा समाविष्ट करण्यात येत आहे. तर मागील निवडणुकीतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न ही केले जात असल्याचे ही डॉ. विपिन इटनकर म्हणाले. 25 जुलैपर्यंत मतदार नोंदणीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे ज्यांनी नावे डिलीट झाली असतील, त्यांनी ती समाविष्ट करण्यासोबत नवीन मतदारांनी नोंदणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या