मुंबई : आम्हाला तिसरा पक्ष म्हणतात अशी खंत व्यक्त करत आम्हाला एकट्याला लढू द्या, देखते है किसमे कितना है दम अशी आव्हानाची भाषा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. आम्हाला स्वबळावर लढू द्या असा आग्रह भाई जगताप यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यानंतर आता भाई जगतापांनीही स्वबळाचा नारा दिला आहे.


राहुल गांधींचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पंतप्रधान करायचंच असा निश्चय काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यासंबंधी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये बोलताना आम्हाला तिसरा पक्ष म्हटलं जातंय अशी खंत भाई जगतापांनी व्यक्त केली. येत्या निवडणुका या आम्हाला स्वबळावर लढू द्याव्यात अशी मागणी त्यांनी प्रभारी एच.के. पाटील यांच्याकडे केलीय. महाराष्ट्राच्या प्रभारींनी हा संदेश सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे पोहचवावा अशी विनंतीही त्यांनी केली. 


आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढवल्या जातील असं काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर शिवसेनेचाही सूर काहीसा तसाच होता. पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष मात्र 'एकला चलो' चा नारा देत आहेत. 


सध्या काही निवडणुका नाहीत, त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडी घट्ट असून हे सरकार पाच वर्षे टिकेल असं शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे म्हणाल्या. तर राष्ट्रवादीचेकडूनही तशाच प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. त्या आधी शिवसेना खासदार संजय राऊतांनीही हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि महाविकास आघाडी बुलंद राहिल असं सांगितलं होतं.


महत्वाच्या बातम्या :