लातूर : दुहेरी हत्याकांडाने लातूर शहर हादरलं. शहरातील भांबरी चौकात बुधवारी (28 ऑगस्ट) एक धक्कादायक घटना घडली. नवरा-बायकोचा वाद विकोपाला गेला आणि त्यात दोघांचा खून झाला.


लातूर शहरातील भांबरी चौक इथे भीमा चव्हाण आणि ललिता चव्हाण हे पती-पत्नी राहतात. मागील अनेक दिवसापासून यांच्यात प्रचंड वाद आणि भांडण होते. वादाचं पर्यावसन बऱ्याच वेळेस हाणामारीतही झालं होतं. याबाबत पती-पत्नीने अनेक वेळा एमआयडीसी पोलीस ठाण्यात तकारही दिल्याची माहिती आहे.

28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी हा वाद विकोपाला गेला होता. यानंतर ललिता चव्हाणने आपला भाऊ बालाजी राठोडला फोन करुन बोलावून घेतलं होतं. बालाजी राठोडने आपल्याबरोबर आपले मित्र आणि नातलगही आणले होते. याची माहिती मिळताच भीमा चव्हाणनेही वरवंटी या गावावरुन आपले नातलग बोलवले, यात त्याचा भाचा आणि पुतण्याचा समावेश होता.

भीमा चव्हाण यांच्या भांबरी चौक इथल्या घरासमोर प्रचंड भांडण झालं. वादावादी आणि हाणामारीचा प्रकारही घडला. यात भीमा चव्हाण यांचा पुतण्या आनंद आणि भाचा अरुण यांचावर प्राणघातक हल्ला झाला. चाकूचा जीवघेणा वार झाल्यामुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याची पथक तिथे तात्काळ दाखल झालं. लातूरसारख्या शहरात दुहेरी हत्याकांड झाल्याने पोलिस विभाग खडबडून जागा झालं. आरोपांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथकं पाठवली होती. या घटनेतील दोन-तीन आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही वेळात ताब्यात घेतलं. उर्वरित आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिसांची तीन पथकं तयार करण्यात आली आहेत. मृतदेह लातूरच्या सरकारी दवाखान्यात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, भीमा चव्हाण हा लातूर येथील एमआयडीसीमध्ये मजुरी करत होता तर ललिता चव्हाण एमआयडीसीमध्ये चहाची टपरी चालवत असे. या पती-पत्नीला दोन मुली, दोन मुले आहेत. परंतु या नवरा-बायकोच्या भांडणांमध्ये दोन जणांचा हकनाक बळी गेला आहे.