मुंबई :  मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Expressway)   शेवटचा टप्पा विधानसभा निवडणुकीआधी सुरू करण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात समृद्धीचं काम पूर्ण होणार आहे.  इगतपुरी ते आमणे हा 76  किलोमीटरचा टप्पा 98 टक्के पूर्ण झाल्याची माहिती MSRDCचे एमडी अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.


 सध्या नागपूरहून मुंबईला येताना इगतपुरीला एक्स्प्रेसवे संपतो, आणि तिथून मुंबई-नाशिक महामार्ग घ्यावा लागतो. या महामार्गाची पावसाळ्यात दुर्दशा होते. ज्यामुळे तास न् तास वाहतूक कोंडीत अडकावं लागतं.  कोस्टल रोड, अटल सेतू, भुयारी मेट्रो आणि आता समृद्धी महामार्ग ही खुला होणार आहे.


मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग एकूण 701  किमीचा


समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना एकमेकांना जोडली जाणार आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होणर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग एकूण 701  किमीचा आहे. त्यातील नागपूर ते भरवीर असा  महामार्ग सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या आणि इगतपुरी ते आमणे या चौथ्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरु आहे.  विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्याआधी हा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याला ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दुजोरा दिला.


सप्टेंबरअखेरीस नागपुर – मुंबई प्रवास आठ तासात पार करणे शक्य


समृद्धी महामार्ग ठाण्यातील आमणे येथे येऊन संपणार असला तरी आता पुढे हा महामार्ग मुंबई – वडोदरा महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यानुसार इगतपुरी – शांग्रीला रिसॉर्ट, भिवंडी असा काही किमी लांबीच्या रस्त्याचेही काम ‘एमएसआरडीसी’ करीत आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये इगतपुरी – आमणे आणि आमणे – शांग्रीला रिसॉर्ट, भिवंडी दरम्यानचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल होईल. त्यामुळे सप्टेंबरअखेरीस नागपुर – मुंबई प्रवास आठ तासात पार करणे शक्य होईल.


शेवटच्या टप्पा सप्टेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत


एमएसआरडीसीकडून इगतपुरी ते आमनेपर्यंत समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचीही कामे वेगाने सुरू आहेत. सध्या या मार्गावरील 90 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. हा मार्गही जुलैपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यातून नागपूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास समृद्धी महामार्गावरून करणे वाहनांना शक्य होणार आहे. तर उर्वरित महामार्गाची कामे ऑगस्टपर्यंत पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.


हे ही वाचा :


Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी, एन्ट्री पॉइंट्सवर तपासणी