Manoj Jarange West Maharashtra tour: मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे (Manoj Jarange) आमरण उपोषणाच्या 17 दिवसांनंतर पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार असून जगलोच तर अठराव्या दिवशी तसाच ॲम्बुलन्समधून शांतता रॅलीत सहभागी होईन असं मनोज जरांगे म्हणालेत. 


सरकार जर 17 दिवस मरण्याची वाट बघत असेल तर हे सरकारच असू शकत नाही असं म्हणत मनोज जरांगेंनी कठोर आमरण उपोषण आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली करण्याचं जाहीर केलं. 20 तारखेला यांचे २८८ आमदार पाडायचे की ठेवायचे हे ठरवणार असल्याचेही ते म्हणाले.


आमरण उपोषण आणि शांतता रॅलीत १७ दिवसांचं अंतर


सगेसोयऱ्यासह सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्याची 13 जुलैची मुदत संपली आहे. यानंतर २० जुलैपासून आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. या मागणीसाठी आता ते पश्चिम महाराष्ट्रात दौरा करणार असून आमरण उपोषण आणि शांतता रॅलीत 17 दिवसाचे अंतर असल्याचे त्यांनी सांगितले. 


पश्चिम महाराष्ट्राचा दौरा 7 ऑगस्टपासून सुरू


मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे आरक्षणाची मागणी घेऊन पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. 7 ऑगस्टपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून सोलापूरपासून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. यानंतर सांगली , कोल्हापूर ,सातारा व पुणे येथे शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून नाशिकमध्ये रॅलीचा समारोप होणार आहे.


आपल्या जातीसाठी लेकरासाठी मराठ्यांना एकत्र यायचं आहे


आपल्या जातीसाठी आणि लेकरासाठी मराठ्यांना एकत्र यायचं आहे. व्यावसायिक नोकरदार मराठ्यांनी एक दिवस कामे बंद ठेवून मोठ्या संख्येने ताकद दाखवायचे आहे. ज्या शहरात रॅली आहे तेथील मराठ्यांनी सहकुटुंब शांत कार्यालयात सहभागी होण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.


या बैठकीत ठरवणार 288 पाडायचे का ठेवायचे


मनोज जरांगे 20 जुलै रोजी अंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसणार असून महाराष्ट्रातील मराठा समाजाची बैठक कधी घ्यायची हे त्यादिवशी ठरवणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. या बैठकीत 288 आमदार पाडायचे की ठेवायचे हे ठरवणार असल्याचे ते म्हणाले.


मराठ्यांचे आमदार मराठ्यांवर घालू नका


मराठ्यांचे आमदार, मराठ्यांचे मंत्री मराठ्यांवर घालू नका असा इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. ते म्हणाले की, तुम्हाला गोडीत सांगतोय, मराठ्यांमध्ये मारामाऱ्या लावू नका, आता मराठे तुमच्याकडे निघतील. तुम्ही मराठ्यांच्या जीवावर मोठे झाला, आता मारामाऱ्या लावून मजा बघू नका. 


हेही वाचा:


तू किती पैसेवाला आणि करप्ट, एवढं प्रेम असेल तर फडणवीसांसोबत लग्न कर; मनोज जरांगेंचं प्रसाड लाड यांना प्रत्युत्तर