मुंबई : राज्यासह देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मथुरेसह मुंबईतील जुहूच्या इस्कॉन मंदिरात मध्यरात्री श्रीकृष्णाच्या जन्मसोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मात्र अनेक मोठ्या आयोजकांनीही यंदा दहीहंड्या रद्द केल्याने गोविंदांमध्ये नाराजी आहे.


मुंबईत दरवर्षी साधारणत: तीन हजार लहान-मोठ्या दहीहंड्यांचं आयोजन केलं जातं. त्यातील प्रमुख हंड्यांचा खर्च काही कोटींच्या घरात असतो. यापैकी मोठ्या मंडळांच्या दहीहंड्या यंदा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. तसंच गिरगाव, दादर, कुर्ला या भागांमधील राजकीय हंड्याही यंदा होणार नाहीत.

अनेक राजकीय हंड्या रद्द
राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक राजकीय दहीहंड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप नेते राम कदम यांच्या घाटकोपरमधील दहीहंडीपाठोपाठ सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानची वरळीतील आणि प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराने होणारी दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. ही रक्कम पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा या दहीहंड्या रद्द?
- राम कदम यांची घाटकोपरमधील दहीहंडी
- आमदार प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी
- सचिन अहिर यांची वरळीतील दहीहंडी

ठाण्यात मनसेची दहीहंडी
ठाण्यातील दहीहंडी ही गोविंदासाठी पंढरी मानले जाते. मात्र यंदाच्या दहीहंडी उत्सावाला किनार आहे ती महाराष्ट्रात आलेल्या पुराची. कोल्हापूर, सातारा, सांगली याठिकाणी आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणच्या दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. तर ठाणे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दहीहंडी आयोजन केली आहे. मात्र याचबरोबर ते पूरग्रस्तांसाठी साडेपाच लाख रुपये तसेच 12 घरे बांधून देणार आहेत. प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान साधेपणाने दहीहंडी साजरी करणार आहे. अमाप पैसे खर्च न करता तेच पैसे पूरग्रस्तांना देणार आहेत. यात गोविंदाही मागे नाहीत. दहीहंडी फोडून जे पैसे कमावले जाणार आहेत,  त्यापैकी मोठा हिस्सा हा पूरग्रस्तांना मदत करण्याचे अनेक पथकांनी ठरवले आहे.

ठाण्यात खर्चाला फाटा देत पारंपरिक पद्धतीने दहीहंडी
ठाण्यातील टेंभी नाका, वर्तनकनगरमधील संस्कृती प्रतिष्ठान, रघुनाथ नगरमधील संकल्प प्रतिष्ठान, हिरानंदानी मेडोजमधील समर्थ प्रतिष्ठान आणि मनसेच्या नौपाड्यातील दहीहंडी यंदा पारंपरिक पद्धतीने साजरी होईल.

विरारमध्ये मानाची हंडी फोडून सलामी
मात्र वसई, विरारमध्येही दहीहंडीचा उत्साह दिसत आहे. 'बजरंग बली की जय'च्या जयघोषात अनेक भागात मानाची हंडी फोडण्यात आली. नालासोपारा पूर्वेकडील संयुक्तनगर सेथे गोविंदा पथकाने हंडी फोडून सलामी दिली. दिवसभरात परिसरातील हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकं आता सज्ज झाली आहेत.