जळगाव जिल्ह्यात अमळनेर हा एक ऐतिहासिक तालुका आहे. येथे साने गुरुजी यांचे वास्तव्य राहिलेले आहे. संत सखाराम महाराज यांची पावन भूमी आहे. जुने मंगळग्रह मंदिर आहे. विप्रोसारख्या कंपनी असतानाही हा मतदारसंघ विकासासाठी आसुसलेला आहे. सामाजिक चळवळीदेखील याठिकाणी आहेत. येथील मतदार राजा हा कुणा एका पक्षाचा दिसून येत नाही. नवा उमेदवार याठिकाणी निवडून येत आहे.


याठिकाणी गेल्या 10 वर्षात सर्व प्रमुख पक्षांना मागे टाकून अपक्ष उमेदवार निवडून येत असून त्यांनी सत्ताधारी पक्षाचे सहयोगी आमदार म्हणून राहणे पसंत केलेले आहे. 2009 साली आयत्या वेळी उमेदवारी दाखल करीत अपक्ष आमदार साहेबराव पाटील यांनी विजय संपादन केला होता. तर मागील 2014 साली विधानसभा मतदारसंघात शिरीष चौधरी हे अपक्ष उमेदवार निवडून आले होते. शिरीष चौधरी हे तालुक्याबाहेरील असूनही मतदारांनी त्यांना निवडून दिले आहे. ते भाजपचे सहयोगी आमदार आहेत.

दरवेळी वेगळा उमेदवार निवडून देण्याची परंपरा या मतदारसंघात आहेत. यावेळी अपक्ष आमदार म्हणून शिरीष चौधरी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्यांच्या बाजूने वोटबँक मजबूत करण्यासाठी ते वर्षभरापासून प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अनिल भाईदास पाटील हे पुन्हा रिंगणात उतरण्याची तयारी करीत असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे सक्षम पर्याय आजतरी नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसची येथे स्थिती मध्यम आहे. कार्यकर्ते आहेत मात्र संघटन करण्यासाठी सक्षम नेतृत्व नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडून येण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

हे ही वाचा - धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसपुढे बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं आव्हान

भाजपाकडे या ठिकाणी विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ, त्यांचे पती उदय वाघ, तसेच माजी आमदार बी.एस.पाटील, भिकेश पाटील असे चेहरे भाजपात विधानसभेसाठी इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीतील सभेवेळी अमळनेरात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील या मंत्र्यांच्या समोरच उदय वाघ यांनी बी.एस.पाटील यांना केलेली मारहाण संपूर्ण जिल्ह्याने पाहिली आहे. त्यामुळे भाजपवर हाणामारीचा हा कलंक लागला आहे. याठिकाणी बी.एस.पाटील आणि उदय वाघ यांच्यातील वाद पाहता नवीन उमेदवार देण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल अशी चिन्हे आहेत. या शिवाय भाजपात गेलेले माजी अपक्ष आमदार साहेबराव पाटील हेदेखील उमेदवारीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. पाडळसरे धरणाचा प्रकल्प संजीवनी देणारा आहे. तो प्रकल्प पूर्ण करण्याची गरज सत्ताधारी पक्षाची आहे. निधीच्या कमतरतेमुळे या धरणाचे काम अपूर्णावस्थेत आहे. या ठिकाणी गिरीश महाजन यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. येथील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांमधील वाद सोडविण्यासाठी गिरीश महाजन यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. तेव्हाच भाजपच्या उमेदवाराचा  विजय शक्य होईल, असे येथील राजकीय विश्लेषक सांगतात. एकनाथराव खडसे यांचा या मतदारसंघावर विशेष प्रभाव नाही.

हे ही वाचा -जळगाव शहर मतदारसंघ | युतीचं वाढतं वर्चस्व, तर सुरेश जैन यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई

कॉंग्रेस पक्षाकडे अॅड.ललिता पाटील, त्यांचे पती शाम पाटील आणि चिरंजीव तथा युवक अध्यक्ष पराग पाटील असे तिघेही उमेदवारीसाठी पर्याय आहेत. कॉंग्रेस पक्षाचे या ठिकाणी विशेष संघटन नाही. संघटन तयार करण्यासाठी नेत्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजप केंद्र आणि राज्यातील कामकाजाच्या बळावर मते मागण्याची शक्यता असून भाजपच्या विरोधातील मुद्दे उचलून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस तसेच अपक्ष आमदार रिंगणात उतरतील असे चित्र दिसत आहे.

मागील विधानसभेतील चित्र
शिरीष चौधरी (अपक्ष) – ६८,१४९
अनिल भाईदास पाटील (भाजपा) – ४६,९१०
साहेबराव पाटील (राष्ट्रवादी ) – ४३, ६६२

शिरीष चौधरी २१,२३९ मताधिक्याने विजयी.

- जाणून घ्या या मतदारसंघाविषयी