रत्नागिरी :लॉकडाऊनमुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक जण अडकून पडले आहेत. प्रत्येकाकडून आपल्या घरी, गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्याकरता जिल्हा प्रशासनाकडून देखील सहकार्य केले जात आहे. नागरिकांना ऑनलाईन पास देत त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले जात आहे. यामध्ये लालपरी अर्थात एसटी देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कारण राज्याच्या कानाकोपऱ्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी आता एसटीची मदत घेतली जात आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यामधून या एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत.


आज रत्नागिरीतून देखील सिंधुदुर्ग आणि ओरोसकरता दोन एसटी बसेस सोडण्यात आल्या. यामधून 39 प्रवाशांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना यावेळी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले होते. शिवाय, सोशल डिस्टन्सिंग राखत रत्नागिरी जिल्ह्यात अडकलेल्यांना त्यांच्यामुळ गावी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. जिल्ह्यातील विविध एसटी आगारातून या एसटी बसेस सोडण्यात आल्या. दरम्यान, जिल्ह्यातून 25 एसटी बसेस या रायगड, सिंधुदुर्ग, बुलढाणा, लातूर, भंडारा, सातारा, गोंदिया आणि अमरावतीकरता सोडण्यात येणार आहेत.

शुक्रवारी ( 8 मे ) रत्नागिरी जिल्ह्यातून सहा एसटी बसेस सोडण्यात आल्या. चिपळूण , लांजा, रत्नागिरी आणि दापोलीमधून या एसटी बसेस सिंधुदुर्ग आणि रायगडकरता सोडण्यात आल्या. तर, आज ( 9 मे ) 16 एसटी बसेस या सिंधुदुर्ग, रायगड, भंडारा, बुलढाणा आणि साताराकरता सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी, देवरूख, दापोली, चिपळूण, गुहागर, मंडणगड या आगारातून या एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच उद्या अर्थात 10 मे रोजी देखील गोंदिया आणि अमरावती करता तीन एसटी बसेस या खेड, मंडणगड आणि चिपळूण या एसटी आगारातून सुटणार आहेत.

ऑनलाईन अर्जांच्या संख्येत वाढ
जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी जाता यावे. शिवाय, जिल्ह्याबाहेर अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावी येण्याकरता जिल्हा प्रशासनाकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. या अर्जांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्याबाहेर जाण्याकरता 28,880 तर येण्याकरता 30,814 अर्ज करण्यात आले आहेत.

मजुरांची संख्या देखील मोठी
रत्नागिरी जिल्ह्यात देखील सध्या परराज्यातील हजारो मजूर अडकून पडले आहेत. त्यांच्याकडून देखील आपल्या गावी जाण्याकरता प्रयत्न केले जात आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये देखील त्यांची संख्या ही मोठी आहे. सध्या काम नसल्याने त्यांचे देखील हाल होत असल्याचे चित्र आहे. आमच्याकडे काम नाही, पैसे नाहीत त्यामुळे आता आम्ही करायचे तरी काय? आम्हाला आमच्या गावी जायचे आहे, अशी प्रतिक्रिया सध्या मजुरांकडून येत आहेत. अनेक मजूर तर पायी आपला गाव जवळ करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर काही जण छुप्या पद्धतीने गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.