कोल्हापुरात पूरग्रस्त महिलांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर थाटला संसार; रस्तारोको करत आंदोलन
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2019 05:49 PM (IST)
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महिलांचा पुणे-बंगळुरु महामार्ग रास्तारोको; रस्त्यावरच थाटला संसार

कोल्हापूर : पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी कोल्हापुरातील महिलांनी पुणे-बंगळुरु महामार्ग अडवून आंदोलन केले. यावेळी महामार्गावरच संसार मांडत आंदोलन केल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलीसांनी आंदोलनातील महिलांची धरपकड करत आंदोलनाला शांत करण्याचा प्रयत्न केला. अतिवृष्टी, पूर आणि धरणांमधून मोठय़ा प्रमाणात करण्यात आलेल्या विसर्गामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे हाहाकार उडाला होता. या पुरात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झाले. सामाजिक बांधिलकी जपत राज्यभरातून कोल्हापूरकरांसाठी मदत पोहचवण्यात आली. मात्र, ही मदत संसार उभे करण्यासाठी तुटपुंजी पडली. दरम्यान, राज्य सरकारनेही मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली होती. मात्र, याची अमलबजावणी अद्याप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पुरग्रस्तांना योग्य मदत मिळावी यासाठी महिलांनी आज पुणे-बंगळुरु महामार्ग अडवला. छत्रपती शासन महिला आघाडीचं आंदोलन - कोल्हापुरातील छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग सुमारे अर्धा तास दोनशेहून अधिक महिलांनी रोखून धरला होता. या आंदोलनात जिल्ह्यातील इचलकरंजी, शिरोळ, राजापूर, टाकळीवाडी, दतवाड, घोसरवाड, दानवाड या ठिकाणाहून महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी रस्त्यावरच चूल मांडून या महिलांनी संसार थाटला. महापुरात अनेक संसार रस्त्यावर - महापुरामुळे कोल्हापुरात अनेक संसार रस्त्यावर आले. सहा जणांचा मृत्यू झाला. मालमत्तेच्या नुकसानीची तर गणतीच नाही. लाखो हेक्टर जमिनीवरील पिके वाहून गेली, हजारो जनावरे मृत्युमुखी पडली. हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. या काळात कोल्हापुरात पावणेतीन लाखांहून अधिक जणांचं स्थलांतर करण्यात आलं. यावेळी सरकारकडून मदतीचे आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, सरकारकडून म्हणावीतशी मदत अजूनतरी मिळालेली नाही. वारंवार पाठपुरावा करुनही मदत न मिळाल्याने महिलांनी अखेर आंदोलनाचा पर्याय स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले आहे. संबंधित बातम्या : मटण दरवाढीविरोधात नोटीस बजावल्याबद्दल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाची नोटीसमटण दरवाढीवर तोडगा, कोल्हापुरात मटणाचे दर कमी झाल्याने आनंदोत्सवपूरग्रस्तांचे संसार सावरले, मात्र कोल्हापुरातील देवदूताचा संसार अद्यापही उघड्यावरKadaknath Kombdi | कडकनाथ कोंबडी घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा : शेतकरी | कोल्हापूर | ABP Majha