कोल्हापूर : मटणाचे दर वाढल्याने अस्वस्थ असलेल्या कोल्हापूरकरांनी  सुटकेचा निश्वास सोडला. मंगळवारी (10 डिसेंबर)  झालेल्या बैठकीत मटणाला 480 रूपये किलो एवढा दर खाटीक समाजाने मान्य केला. या निर्णयामुळे कोल्हापूरकरांनी आनंदोत्सव साजरा केला. गेल्या महिन्यापासून गाजत असलेल्या मटण दराच्या वादावर आज तोडगा निघाला. शिवाजी पेठेत खाटीक समाज आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात बैठक झाली.


गेल्या एक महिन्यापासून कोल्हापूरकरांच्या आवडीचं मटण 580 रूपये प्रति किलो पेक्षा महाग झाल्याने कोल्हापूरकर अवस्थ होते. मटणाचे दर कमी करावेत यासाठी कोल्हापूरकरांनी वेगवेगळ्या प्रकारे निदर्शने केली. हा प्रश्न थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यत पोहचला. आता मटणाचे दर योग्य पातळीवर आल्याने कोल्हापूरकरांनी समाधान व्यक्त केलं आहे.

कोल्हापुरातल्या मटण दरावर खासदार संजय मंडलिक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मंडलिक म्हणाले, मटण दराचा प्रश्न अखेर सुटला, त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर ही खवय्यांची नगरी आहे. त्यामुळे या दरवाढीने फटका बसला होता. कोल्हापुरातले कार्यकर्तेही स्वाभिमानी आहेत कुठलाही प्रश्न हातात घेतला की तडीस नेतात. अनेक तालमीमध्ये ही त्यामुळे दरवाढीला विरोध होता.

कोल्हापुरात जन्माला येणारं बाळ दुधाबरोबर तांबडा-पांढरा पिऊनच मोठं होतं, असं असताना वेळी योग्य दरात नागरिकांना मटण मिळणं गरजेच बनलं आहे. त्यामुळेच हा वाद मिटेपर्यंत सार्वजनिक मंडळांनी मटणाचे स्टॉल्स उभा केले होते. एकीकडे स्वस्त दरात मटण दिले जात होते. नागरिक गर्दी करत होते, तर दुसरीकडे पारंपरिक पद्धतीने विक्री करणाऱ्या दुकानांसमोर शुकशुकाट होता. भर रस्त्यात रांगा लावून नागरिक मटण विकत घेत होते.

जिल्हाधिकाऱ्यांकडे हा वाद पोहोचल्यानंतर त्यांनी एक समिती स्थापन केली. या समितीला अहवाल देण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. एका वेगळ्या विषयाला सामोरं जावं लागत असल्याचंही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलं. हा वाद फक्त कोल्हापूर शहरापुरता मर्यादित राहिला नाही. तर ग्रामीण भागातही पोहोचला. गारगोटी आणि कडगाव ग्रामपंचायतीने देखील यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 11 डिसेंबर रोजी यावर सुनावणी आहे. खाटीक समाज मात्र बकऱ्यांची आवक कमी झाल्यानं दर वाढल्याचं सांगत आहेत.

मटण कोल्हापूरकरांचा जीव की प्राण आहे. शाकाहारी कमी आणि मांसाहारी नागरिकांची संख्या कोल्हापुरात जास्त आहे. भाजीपाल्याचे दर मार्केट दरानुसार कमी-जास्त होतं असतात. मात्र आतापर्यंत आपण मटणाचे दर कधी कमी झाल्याचं ऐकलं नाही. मटणाच्या दराचा आलेख वाढतच आहे. मटणाने आता 600 रुपयांपर्यंत मजल मारल्याने कोल्हापूरकर संतापले आहेत.