मुंबई: कर्नाटकात सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या बी एस येडियुरप्पा यांना आज दुपारी 4 वाजता सर्वांसमक्ष बहुमत सिद्ध करायचं आहे.


निवडणूक झालेल्या 222 जागांपैकी भाजपला 104 ठिकाणी विजय मिळवता आलेला आहे. त्यामुळे बहुमताचा 112 हा आकडा गाठण्यासाठी भाजपला पळापळ करावी लागत आहे.

कर्नाटकात सध्या ही परिस्थिती असताना, चार वर्षापूर्वी म्हणजेच 2014 मध्ये महाराष्ट्रातही अशीच काहीशी परिस्थिती होती.

त्यावेळी अल्पमतात असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारलाही बहुमत चाचणीला सामोरं जावं लागलं होतं. शिवसेनेसोबतची युती निवडणुकीपूर्वीत तुटल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये खूपच कटुता आली होती. शिवाय प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांनी खालची पातळी गाठली होती.

त्यातच भाजप मोठा पक्ष ठरल्यामुळे फडणवीसांनी शपथविधी आटोपून घेतला होता, तर विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे दिलं होतं. शिवसेना सत्तेत सहभागी झाली नव्हती. अशा परिस्थितीत फडणवीसांना बहुमत सिद्ध करायचं होतं. त्यावेळी प्रचंड गदारोळात बहुमत पार पडलं होतं आणि  राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या मदतीला धावली होती.

2014 मध्ये विधानसभेत नेमकं काय झालं होतं?

महाराष्ट्रात 2014 मध्ये 288 जागांसाठी विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकीत

भारतीय जनता पार्टी: १२२ जागा, शिवसेना: ६३ जागा, काँग्रेस: ४२ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस : ४१ जागा मिळाल्या होत्या.

याशिवाय अन्य छोट्या पक्षांपैकी  बहुजन विकास आघाडी: ३ जागा,शेतकरी कामगार पक्ष: ३ जागा,एमआयएम: २ जागा,भारिप बहुजन महासंघ: १ जागा,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष: १ जागा,महाराष्ट्र नवनिर्माण सेना: १ जागा,राष्ट्रीय समाज पक्ष: १ जागा,समाजवादी पक्ष: १ जागा, अपक्ष: ७ जागा

या निवडणुकीत, 122 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर 63 जागांसह शिवसेना दुसऱ्या स्थानी होती. दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले होते. सुमारे 25 वर्षांची शिवसेना-भाजप युती तुटली होती.

त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर 145 गाठण्यासाठी कोणाची तरी मदत घेणं आवश्यक होतं. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीने आधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता.

12 नोव्हेंबर 2014 रोजी काय झालं?
अल्पमतात असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने 12 नोव्हेंबर 2014 रोजी महाराष्ट्र विधानसभेत आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. प्रचंड गदारोळात ही प्रक्रिया पार पडली होती.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मांडलेला विश्वासदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.

मात्र याला शिवसेनेनेसह काँग्रेसने आक्षेप नोंदवत मतविभाजन करण्याची मागणी केली. पण विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेची मागणी फेटाळली. कोणत्या पक्षाची किती मतं हे जाणून घेण्यासाठी शिवसेनेने मतविभागणीची मागणी केली होती.

एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेतेपदी
सभागृहात गोंधळ सुरु असतानाच, नवनिर्वाचित अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली होती. या दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली होती.

राष्ट्रवादीचा ठपका पडू नये म्हणून खेळी केल्याचा आरोप
देवेंद्र फडणवीस सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाला होता, मात्र तो ठपका लपवण्यासाठी भाजपने आवाजी मतदानाची खेळी केल्याची चर्चा, त्यावेळी होती.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडे बहुमत नाही, असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा असं आव्हान दिलं होतं. आवाजी मतदानावेळी कोणीच पोलची मागणी केली नाही, त्यामुळं आता कांगावा करणारे, तेव्हा काय करत होते असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला होता.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसविषयी विचारलं असता, "राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्हाला आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळं त्यांचा आम्हाला पाठिंबा आहेच, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीची मदत झाल्याचं स्पष्ट केलं होतं".

त्यामुळं निवडणुकीत राष्ट्रवादीवर टीका करत सत्तेपर्यंत पोहोचलेल्या भाजपला शिवसेनेचा विरोध होत असताना राष्ट्रवादीनंच तारल्याचं त्यावेळी स्पष्ट झालं होतं.
संबंधित बातम्या

फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले

..तर आमच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणा, मुख्यमंत्री फडणवीस यांचं आव्हान

देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

बहुमतासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्याने भाजप नगरसेवकाचा राजीनाम्याचा इशारा  

शिवसेनेसाठी भाजपचे सर्व दरवाजे खुले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान