अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार रोहिदास दातीर यांची 6 एप्रिलला अपहरण करून निर्घृण हत्या झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. आता या हत्येप्रकरणी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी थेट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर आरोप केले आहेत. प्राजक्त तनपुरे यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. मात्र पत्रकाराच्या हत्येवरून आगामी काळात घडणाऱ्या घडामोडींवर आता जनतेच लक्ष लागले आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील पत्रकार व दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर आपल्या दुचाकीवर घराकडे जात असताना स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांचे 6 एप्रिलला मंगळवारी दुपारी अपहरण केल्याची घटना घडली होती. राहुरी पोलीस ठाण्यात रोहिदास दातीर यांच्या पत्नीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी आणि गाडीचा शोध सुरू केला होता. 


मात्र मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास रोहिदास दातीर यांचा कॉलेज रोडला मृतदेह आढळला. डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं प्रथमदर्शनी समोर आले असून पोलिसांनी काही संशयित ताब्यात घेतल्यानंतर तपासला वेग आला आहे. मात्र आता माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सुत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांच्यावर कर्डीले यांनी टीका केली आहे. अनेक प्रकरणात तनपुरे यांची भूमिका संशयापसद असून त्याविरोधात दातीर यांनी लक्ष घातल्याने घातपात झाला असल्याची शक्यता कर्डीले यांनी व्यक्त केली आहे.


अहमदनगरमध्ये पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरण करून हत्या


दरम्यान या प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. माझा किंवा आमच्या कोणत्याही नातेवाईकांसंदर्भात होत असलेला आरोप निरर्थक असून कोणाकडे पुरावे असतील तर ते त्यांनी पोलिसांना द्यावें असं आवाहन सुद्धा त्यांनी केले आहेत. 


इतर क्राईम न्यूज