Chhatrapati Sambhajinagar: राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडत असताना मराठवाड्यात मात्र अजून हलक्या ते मध्यम सरीच आहेत. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणातील (Jayakwadi Dam) पाणीसाठा अजून 'जैसे थे' च आहे. 


पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही जायकवाडी धरणात आज केवळ 4.1 टक्के म्हणजेच केवळ 3 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.


जुलै महिन्यात पावसाची हुलकावणी


मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याचे चित्र आहे. जुलैच्या तुलनेत जायकवाडी धरण विभागात 204 मिमी पाऊस झाला. मात्र जुलैच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने जायकवाडीच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ झाली नसल्याचे दिसून येत आहे.


जलसंपदा विभागाने नोंदवलेल्या पावसाच्या नोंदीनुसार , मागील वर्षी 1 जून ते जुलै दरम्यान केवळ 64 मिमी पावसाची नोंद झाली होती. ती यंदा 204 मिमी एवढी झाली आहे. जुलै महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह बहुतांश ठिकाणी पावसाने दडी मारल्याचे चित्र असून शेतकऱ्यांसह नागरिकांना भीषण पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे.


हजारो गावांची जायकवाडीवर मदार


मराठवाड्यातील सर्वाधिक 2170 दलघमी जलक्षमतेचे हे धरण असून या धरणावर छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातील हजारो गावांची तहान अवलंबून आहे. तसेच औष्णिक वीज प्रकल्प तसेच शेतीसाठीही या धरणाचा पाणीसाठा महत्त्वाचा ठरतो. 


14 जुलै रोजी सकाळी 8 वाजता मोजण्यात आलेल्या पाणीपातळीनुसार जायकवाडी धरणात आज 87.11 दलघमी पाणीसाठा ( 4.1% ) शिल्लक असून मागील वर्षी हा पाणीसाठा 27.14% एवढा होता.


मराठवाड्यातील एकूण धरण साठा 10.60%


राज्यभरातील धरणांमध्ये आता हळूहळू पाणी साठ्यात वाढ होत असताना मराठवाड्यातील लघु मध्यम व मोठी अशी  एकूण 920  धरणे मात्र अजून 10.60 टक्के एवढीच भरली आहेत. राज्यातील इतर पाच विभागांच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीसाठा सर्वात कमी असल्याचे जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीतून दिसून येते.


छत्रपती संभाजीनगर विभागात ९० टक्के खरीप पेरण्या पूर्ण


कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभागात ९० टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून पावसाच्या मोठ्या सरींची शेतकरी वाट पहात आहेत. मागील वर्षी पावसाच्या विस्कळीत स्वरूपाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, हवामान विभागाने या वर्षी सरासरीहून अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज दिल्यानंतर शेतकऱ्याला चांगल्या पावसाची आशा आहे. 


हवामान विभागाकडून मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असला तरी अजूनही तुरळक भागात हलक्या सरीच येत असल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा:


तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी जायकवाडी पक्षी अभयारण्याचा दर्जा रद्द करण्याचा घाट, भाजप खासदार भागवत कराडांची वनविभागाकडे मागणी