भातुकली खेळताना गोठ्याला आग, तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 04 Feb 2019 02:51 PM (IST)
भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर गावात आज (4 फेब्रुवारी) सकाळी दहाच्या सुमारास या तीन चिमुकल्यांनी खेळताना शेकोटी पेटवली.
जालना : भातुकली खेळताना शेकोटीमुळे गोठ्याला लागलेल्या आगीत तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. मृतांमध्ये एका मुलीचा समावेश आहे. भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर गावात आज (4 फेब्रुवारी) सकाळी दहाच्या सुमारास या तीन चिमुकल्यांनी खेळताना शेकोटी पेटवली. मात्र हवेमुळे आग पसरल्याने त्यांनी शेजारच्या गोठ्यात धाव घेतली. दुर्दैवाने गोठ्यात कडब्याच्या गंजीला आग लागल्याने मुलांचा होरपळून मृत्यू झाला. गोठ्यातील पत्र्याच्या या शेडमध्ये दरवाजाजवळ कडबा होता. शिवाय शेडला एकच दरवाजा असल्याने मुलं मध्येच अडकली आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.