Eknath Khadse on Girish Mahajan : गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना राजकारणात आपण आणलं, त्यांना घडवलं, हे सगळ्या जगाला माहीत आहे. मात्र बापाला विसरणारे अनेक लोक आता जन्माला आले  आहेत, अशी जहाल टीका एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर केली आहे. त्यांच्या या टिकेमुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात विविध चर्चा आता रंगू लागल्या आहेत. 


गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे  नेते एकनाथ खडसे यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करत असताना एका वाहिनीला मुलाखत देताना गिरीश महाजन यांनी कोण एकनाथ खडसे? असा सवाल उपस्थित केला होता. 


गिरीश महाजन यांच्या प्रश्नांना उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, गिरीश महाजन हे आता भाजपचे राष्ट्रीय नेते झाले आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासाठी लहान कार्यकर्ता झालो आहे. मात्र असं असलं तरी गिरीश महाजन यांना राजकारणात आपण त्यांना जन्माला आणले. त्यांना घडविलं आहे. त्यांना तिकीट मिळवून देण्यात आणि विजय मिळवून देण्यास त्यांना मदत केली असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. 


आताच्या काळात बापाला विसरून जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही, सगळ्या जगाला माहीत आहे की, त्यांना राजकारणात कोणी आणलं, वाढविलं, आता परिस्थिती बदलली आहे. गिरीश महाजन हे आता स्वत: च्या बळावर भाजपला निवडून आणतील, अशी शक्यता आता राहिलेले नाही, जिल्ह्यात भाजपला अनेक ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला असल्यानं गिरीश महाजन हे आत्मविश्वास गमावलेले नेते म्हणून राहिले आहेत. असा आत्मविश्वास गमावलेल्या नेत्यांच्या बळावर भाजप आता स्वबळावर निवडून येईल, अशी परिस्थिती आता राहिली नसल्याचं आणि आगामी काळात निवडणुका जवळ असल्यानं कोण किती पाण्यात आहे? हे दिसून येणार असल्याचं, एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha