मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी पाच एप्रिलला रविवारी रात्री नऊ वाजता घराच्या बाहेर येऊन दिवा, मेणबत्ती अथवा टॉर्चचा प्रकाश करण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनला देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, काही अतिउत्साही लोकांनी मशाली पेटवून, फटाके फोडून रस्त्यावर गर्दी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या लोकांचे कान टोचले आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही लोकांनी रस्त्यावर येत अशी कृत्ये करणे म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस असल्याचं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.



कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला घराबाहेर येऊन दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी सोशल डिस्टन्स पाळण्याचंही आवाहन मोदी यांनी केलं होतं. मात्र, काही अतिउत्साही लोकांनी रस्त्यावर येत फटाके फोडले, तर काहींनी मशाल हाती घेत लहान मुलांसह रस्त्यावर फेरी मारल्याचेही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. "देशाच्या पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणं, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. आत्ताच्या परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे.", असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.





कोरोना 'मातोश्री'च्या उंबरठ्यावर, मातोश्री परिसरातील चहावाल्याला कोरोनाची लागण 





जनता कर्फ्यूला असाच गोंधळ
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील महिन्यात 22 मार्चला जनत कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी सायंकाळी पाच वाजता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या वाजवणे किंवा थाळीनाद करण्यास सांगितले होते. या जनता कर्फ्यूला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मात्र, यावेळी काही अतिउत्साही मंडळीने गर्दी करत गोधळ घातल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळीही अजित पवार यांनी टीका केली होती. "कोरोनाविरोधात लढणाऱ्या राज्यातील आरोग्य यंत्रणा,पोलीस प्रशासन आणि सर्वांचेच मनापासून आभार! जनतेनं आपल्या घरातून घंटानाद,थाळीनाद करून त्यांचे आभार व्यक्त केले,त्यांचेही आभार! परंतु,लोकप्रतिनिधी व जनतेनं रस्त्यावर उतरून,एकत्र येऊन हा घंटानाद करणं अपेक्षित नाही." असं ट्विट अजित पवार यांनी केलं होतं.


9 Min Blackout | दिवे लावताना नागरिकांनी बाहेर पडू नये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जनतेला आवाहन