पालघर : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही समाजकंटक चोर, दरोडेखोर येतात आणि किडन्या काढून नेतात अशा वेगवेगळ्या अफवा नागरिकांमध्ये पसरवत असल्याने धक्कादायक प्रकार घडत आहेत. याच अफवांमुळे जमावाने तीन जणांची हत्या केल्याचं काल उघड झालं होतं. या प्रकरणी आरोपींवर कलम 302, 120(ब)427, 147, 148, 149/307, 353, 333, 323, 341 कासा पोलीस ठाण्यात एकूण तीन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 110 जणांना अटक करण्यात आली असून इतर 200 ते 300 जण फरार आहेत. अटक केलेल्या 110 आरोपींपैकी 9 आरोपी 18 वर्षांखलील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तर अन्य 101 आरोपींना डहाणू कोर्टाने 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवलीहून आपल्या गुरुचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी सुशील गिरी महाराज (35), चिकणे महाराज (70) आणि चालक निलेश तेलगडे (30) इको कारने सूरतकडे निघाले होते. त्यांच्याकडे कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथे पोलिसांनी माघारी पाठवले. परंतु त्यांना सूरत गाठायचंच होतं म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पोचले.


मात्र त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ असलेल्या जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह त्यांची कार पलटी केली. तेथे असलेल्या गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली, त्यामुळे तात्काळ 10.30 वाजेच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तिघांना कारमध्ये बसवून जखमी अवस्थेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने चार पोलिसांचे काहीच चालले नाही. यावेळी पोलिसांबरोबर असलेल्या जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांनीही जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना कसंबसं आपल्या गाडीत बसवले.


मात्र त्यानंतर जमाव अधिक आक्रमक झाला आणि गाडीबरोबर पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलीस कसेबसे बचावले, परंतु त्या तीन जणांची जमावाने पोलिसांच्या गाडीतच दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या केली. मृतांमध्ये सुशील गिरी महाराज, चिकणे महाराज आणि चालक निलेश तेलगडे यांचा सामवेश होता. तर कासा पोलीस ठाण्याचे पीएसआय कटारे व इतर तीन कर्मचारीही जखमी झाले आहे.


घटनेनंतर पालघर पोलीस दलाचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तेव्हाही जमाव आक्रमकच होता. पोलिसांनी हल्लेखोरांची धरपकड सुरू केली, त्यावेळीही काही हल्लेखोर लपून छपून पोलिसांवर दगडफेक करत होते. अशा स्थितीत जमाव पांगवण्यासाठी जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांनी दोन राऊंड हवेत फायर केले. दरम्यान पोलिसांनी 110 जणांना ताब्यात घेऊन अटक केली. तरीही काही हल्लेखोर जंगलात पळून गेले. पोलिसांनी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या नेतृत्वाखाली रात्रभर जंगलात ही शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.


गेल्या आठवडाभरात अफवांमुळे डहाणू तालुक्यातील सारणी येथे डॉक्टर व पोलिसांच्या गाड्यांवर हल्ला झाला. यामध्ये दोन अधिकारी व दोन कर्मचारी जखमी झाले, तर गुरुवारी रात्री गडचिंचले येथे तिघांची निर्घृण हत्त्या केली व चार पोलीस जखमी झाले. शुक्रवारी रात्री झाई दुबलपाडा येथे भिकाऱ्याला चोर समजून बेदम मारहाण केली. अशा तीन धक्कादायक घटना घडल्या असून पालघर जिल्ह्यात या घटनांनी चिंतेचे वातावरण पसरलं आहे.


पालघर जिल्हाधिकाऱ्यांचं जनजागृती करण्याचं आवाहन


आज पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, संघटनांचे प्रमुख यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून अफवा थांबवून या घटना रोखण्यासाठी सहकार्य करावं व गावागावात, पाड्यापाड्यात जनजागृती करण्याचे आवाहन केले. तर सर्व ग्रामपंचायत हद्दीत व मुख्य रस्त्यांवर अफवा पसरवू नये म्हणून जनजागृती बॅनर लावण्यात येणार आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलही सतर्क झाले असून दिवसा व रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग सुरू केली आहे. तर जे कुणी अफवा पसरवीतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.


संबंधित बातम्या






Business Plan After Lockdown | लॉकडाऊननंतर उद्योग-व्यापारातील तोटा कसा भरून काढायचा? विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांचा कानमंत्र!