पालघर : डहाणू तालुक्यातील कुणबी व आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेले डोंगराच्या कुशीत आणि सूर्या नदीच्या तिरावर वसलेले निसर्गरम्य "उर्सें" गाव ह्या गावाने "एक गांव एक उत्सवाच्या" माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सावचे हे 48 वे वर्ष आहे.
गेल्या 48 वर्षांपासून उर्से गावातील सर्व समाजाच्या महिला, पुरुष व अबालवृद्ध एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोस्तव, गौरी उत्सव, नवरात्रोउत्सव, गोपाळकाला यासह सर्व सण अखंड एकत्र येऊन आनंदाने साजरे करत आहेत. यंदाचे 48 वे वर्ष असून ह्या गावाची लोकसंख्या 2500 च्या आसपास आहे. दरवर्षी गणपती व गौरी उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व खेळांचे आयोजन केले जाते. ह्या गावाला आध्यात्मिक परिवाराची शिकवण आहे हाच आदर्श ह्या गावानं जोपासला आहे. कोणत्याही घरी घरगुती गणपती बसविला जात नाही. म्हणून संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येऊन सर्व उत्सव साजरे करतात.


यंदा जगावर आलेल्या कोरोना संकटामुळे पहिल्याच वर्षी या कार्यक्रमास स्थगिती गावकऱ्यांनी दिली असून यंदा पाच दिवसांचा गणपती अडीच दिवस करण्यात आला आहे. तर अगदी साधे पणाने बाप्पाला विराजमान करत कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. विशेष म्हणजे गावातील तरुण एकत्र येवून डेकोरेशन आणि आरास तयार करत असतात, येथे बनविण्यात येणारी आरासही इको फ्रेंडली असते. ह्या वर्षी साधेपणाने अवकाश तारांगण तयार करून जात्यावर दळण दळणारी माऊली मास्क बांधून गणेश मूर्तीच्या बाजूला ठेऊन त्यात बाप्पाना विराजमान केलं आहे.
जेजुरीतील रशियन महिला करतेय गेल्या 28 वर्षांपासून गणरायाची प्रतिष्ठापणा

विशेष म्हणजे ह्या गावामध्ये तीन मंडळे कार्यरत असून कोणत्याही प्रकारची देणगी गावाच्या बाहेरुन स्वीकारली जात नाही. सर्व आर्थिक बाब ही गावकरीच गोळा करतात. या गावाने स्वतःचे भव्य सभागृह कोणतीही देणगी न घेता उभे केले आहे, सर्व गावकरी इथचं आपले सर्व सण एकत्र साजरे करतात. सर्व कामं ही श्रमदनातून केली जातात. ह्या गावाची परंपरा अशी की गणपती व गौरी विसर्जनानंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो. भगवंता वरचा भाव म्हणून गावकरी सर्व वस्तू चढ्या भावाने आनंदाने खरेदी करतात. ह्या मधून उरलेले पैसे गाव शेतकऱ्यांना व्याजाने वाटप करते. पुढील वर्षी ह्याच पैश्यातून हे सण साजरे करतात. दर वर्षी नवीन मंडळाचे पदाधिकारी बिनविरोध निवडले जातात.

ह्या ठिकाणी जुगार व नश्या यांना पूर्णपणे विरोध असतो व असे करणारास दंड आकारला जातो. येथे कोणताही पोलीस बंदोबस्त बोलाविला जात नाही. अशा प्रतिक्रिया उर्से गांवकरी व्यक्त करतात तर याच सामाजिक भावनेतून संघटित व्हावे हा एकतेचा सामाजिक संदेश ह्या माध्यमातून उर्से गावाने जनतेला देण्याचा प्रयत्न केलाय.

पुण्यात गणपती विसर्जनासाठी कचऱ्याचे कंटेनर दिल्यानं ब्राह्मण महासंघाचं आंदोलन