Chhatrapati Shivaji Maharaj : एकीकडे सिद्दी जौहर त्याच्या हजारो सैन्यासह पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता अन् दुसरीकडे औंरंगजेबचा मामा शाईस्तेखान पुण्यावर चाल करुन येत होता. अशात शिवराय पन्हाळ्याच्या किल्ल्यावर अडकले होते. मग बांदलांच्या आऊसाहेब म्हणजेच दीपाऊसाहेब बांदल यांनी बारा मावळाच्या बांदलाना (Maval Bandal) पत्र लिहिले आणि त्यांना एकत्र केले. तुम्ही परत आला नाही तरी चालेल पण शिवाजीराजांना पन्हाळ्यातून सोडवून परत आणा... असा आदेश त्यांनी त्यांचा पुत्र बाजी बांदल आणि नातू रायाजी बांदल यांना दिला आणि 600 बांदलांची शिबंदी वेगवेगळ्या मार्गाने पन्हाळ्यावर धडकली. याच बांदलांनी आपल्या जीवाची बाजी लावून शिवरायांना पन्हाळ्यावरून सोडवलं आणि विशाळगडावर सुखरूप पोहोचवलं. या बांदलाच्या पराक्रमाचा दिवस म्हणजे 13 जुलै 1660. याच दिवशी बांदलांच्या रक्ताने पावनखिंड पावन झाली आणि सह्याद्रीचा वाघ स्वराज्यात सहीसलामत परत आला. 


सिद्दी जौहारला (Siddi Jauhar) चकवून शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून निसटले आणि विशाळगडच्या वाटेने निघाले. डोंगर कड्याकपारीत लढणाऱ्या काटक अशा 600 बांदलांची शिबंदी त्यांच्यासोबत होती. हे समजताच सिद्दीने त्याचा सरदार, सिद्दी मसूदला पाच हजारांची फौज दिली आणि शिवरायांच्या मागावर पाठवलं. त्यानंतर 300 बांदलांसह बाजीप्रभूंनी खिंड लढवली आणि गनिमाला घोडखिंडीतच (Battle of Pavan Khind) रोखलं. दुसरीकडे रायाजी बांदल यांनी विशाळगडचा वेढा फोडला आणि शिवरायांना विशाळगडावर सुखरूपपणे पोहोचवलं.  


Histoty Of Bandal Sardar : बांदलांचा इतिहास


बांदल म्हणजे बाणाचे दल... बाण दल, जे बाण मारण्यात सर्वोत्कृष्ट, त्यावरुनच त्यांना बांदल असं म्हटलं जायचं. बांदल हे मूळचे बुंदेलखंडचे असल्याचं मानलं जातंय. तिकडून मध्य प्रदेश, गुजरात ते महाराष्ट्र असा त्यांच्या पूर्वजांचा प्रवास असल्याचं सांगितलं जातंय.


बांदल सरदारांचे वंशज राजेंद्र बांदल यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, बांदलांनी 1625 साली निजामाचा शूर वजीर मलिंक अंबरला हरवलं आणि केंजरगड जिंकला. निजामशाह आणि आदिलशाहला न जुमानता त्यांच्याविरोधात बांदल सैन्य उभे राहिलं. 


बांदलांचे प्रमुख कृष्णाजी नाईक बांदल यांच्या पत्नी म्हणजे आऊसाहेब उर्फ दीपाऊसाहेब बांदल. कृष्णाजी बांदलांच्या पश्चात त्यांनी बारा मावळाचे नेतृत्व केलं. नावात बांदल असलं तरी बांदलांनी तलावारीच्या जोरावर चांगलाच दबदबा ठेवला होता. दीपाऊसाहेब बांदल या शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाईसाहेब यांच्या आत्या, त्यांचे मूळचे नाव दिपाऊ नाईक निंबाळकर. 


बाजीप्रभू हे बांदलांचे (Histoty Of Naik Bandal Sardar) प्रमुख सरदार. स्वराज्याच्या सेवेत आलेल्या बांदलांनी अफजलखानच्या वधाच्या वेळी मोठा पराक्रम गाजवला. पण बांदलांचे सर्वात मोठं काम म्हणजे पन्हाळ्यावरून शिवरायांची सुटका. 


शिवाजी महाराज हे पन्हाळ्याच्या सिद्दीच्या वेढ्यात अडकले होते. मार्चमध्ये पडलेला वेढा हा जून संपला तरी कमी झाला नव्हता. वरून धो धो पाऊस कोसळत होता पण तरीही सिद्दी अजगराप्रमाणे आपळा विळखा अधिकच घट्ट करत होता. महाराजांच्या सुटकेसाठी त्यावेळचे सरसेनापती नेताजी पालकर यांनी पन्हाळ्याला धडक मारली. पण त्यांना यश आलं नाही. मग ही जबाबदारी दीपाऊसाहेब बांदलांनी घेतली. 


बारा मावळातील बांदल गोळा केले


दीपाऊसाहेब बांदलांनी बारा मावळातील लढाऊ बांदल एकत्र केले. बाजी बांदल हे त्यांचे पुत्र आणि रायाजी बांदल हे त्यांचे नातू. तुम्ही परत आला नाही तरी चालेल पण सह्याद्रीचा वाघ, शिवराय स्वराज्यात सुखरूप परत आले पाहिजेत असा आदेश त्यांनी दिला. त्यानंतर बाजीप्रभू, फुलाजीप्रभू यांच्यासह बांदलांची शिबंदी वेगवेगळ्या मार्गाने पन्हाळ्यावर पोहोचली. 


दुसरीकडे शिवरायांनी सिद्दीला गाफिल ठेवलं आणि संधी साधली. 12 जुलै 1660 रोजी 600 बांदलांची शिबंदी घेऊन शिवराय पन्हाळ्याच्या वेड्यातून निसटले आणि विशाळगडच्या दिशेने निघाले. गजापूरच्या खिंडीत गेल्यानंतर बाजीप्रभूंच्या नेतृत्वाखाली 300 बांदलांची एक तुकडी मागे राहिली. तर रायाजी बांदलांच्या नेतृत्वाखाली 300 बांदलांची तुकडी शिवरायांना घेऊन विशाळगडाच्या दिशेने गेली. 


तोफेचा आवाज आल्याशिवाय हा बाजी जीव सोडणार नाही... एकाही गनिमाला खिंडीतून पलिकडे जाऊ देणार नाही असा निश्चय केलेल्या बाजीप्रभूंनी खिंड लढवली. स्वराज्याच्या पोशिंद्याला विशाळगडावर सुखरूप पोहोचवायचं या विचाराने एका एका मावळ्यात दहा जणांची शक्ती संचारली होती. मावळ्यांच्या तलवारी वीजेप्रमाणे चमकत होत्या आणि गनिमाचे शीर धडावेगळे होत होते.  


आधी फुलाजीप्रभू धारातीर्थी पडले... नंतर हैबतराव बांदल पडले... शंभूसिंह जाधवराव.. विठोजी काटे... आणि बाजी बांदलही धारातीर्थी पडले. त्यानंतरही बाजीप्रभू लढत राहिले. शेवटी गनिमाची एक गोळी आली आणि तिने बाजीप्रभूंच्या छातीचा वेध घेतला.... बाजीप्रभू खाली पडले, पण त्यांचं लक्ष विशाळगडाकडील तोफेच्या आवाजाकडे लागलं होतं. एवढं होऊनही बांदल लढत होते... त्यांनी एकाही गनिमाला खिंडीतून पलिकडे सोडलं नाही. 


दुसरीकडे रायाजी बांदलांनी विशाळगडावर असलेला आदिलशाहच्या सुर्वे आणि दळवींचा वेढा फोडला आणि शिवरायांना विशाळगडावर सुखरूपपणे पोहोचवलं. विशाळगडावरून पाच तोफांचे आवाज आले आणि बाजीप्रभूंनी प्राण सोडला, इतर बांदल सैन्य जंगलात पसार झाले. पावनखिंडचे घनघोर युद्ध संपले... बांदलांच्या रक्ताने घोडखिंड माखली होती... घोडखिंडीतले प्रत्येक झाड...वाहतं पाणी.... वरून कोसळणारा पाऊस, इथली माती अन् दगडधोंड्यांनी... असमंत आकाशाने बांदल सैन्याचं शौर्य पाहिलं. 


दीपाऊसाहेब बांदलांचे वचन बांदल सेनेने खरे केले आणि सह्याद्रीच्या वाघाला त्या सिद्दीच्या मगरमिठीतून सोडवलं..., अजगराच्या विळख्यातून स्वराज्याचा प्राण सोडवला. 


स्वराज्याच्या पहिल्या समशेरीचा मान बांदलांना 


बांदल सैन्याने स्वराज्यासाठी दिलेले हे अत्युच्च योगदान लक्षात घेऊन शिवरायांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. स्वराज्याच्या सर्वात मोठ्या धारेच्या पहिल्या समशेरीचा मान हा जेधे घराण्याला होता. शिवरायांनी जेधे घराण्याशी सल्लामसलत केली आणि धारेच्या पहिल्या समशेरीचा मान रायाजी बांदल यांना दिला.


बांदलांनी आपल्या शौर्याने, पराक्रमाने पन्हाळ्याची घोडखिंड पावन केली. त्यांच्या पराक्रमाची दखल घेऊन शिवरायांनी घोडखिंडीचे नाव पावनखिंड ठेवलं. ज्या ज्या वेळी स्वराज्याच्या इतिहासाचं स्मरण केलं जाईल, त्या त्या वेळी बांदलांच्या शौर्याचीही दखल घेतली जाणार हे नक्की. 


ही बातमी वाचा: