नागपूर : बिल्डर्स आणि  भ्रष्ट अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचं आपण अनेकदा ऐकतो. मात्र नागपुरात बिल्डरची चूक आणि त्याकडे महावितरण आणि महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे जुळ्या भावंडाना मृत्यूशी झुंझ द्यावी लागत आहे. नागपूरमध्ये राहणारे अकरा वर्षांचे प्रियांश आणि पियुष विजेचा जोरदार शॉक लागल्याने भाजले आहेत. घराला चिटकून गेलेल्या महावितरणच्या हाई टेन्शन लाईनमुळे ही घटना घडली आहे.


1 जून रोजी दोघं भावंडं सुगतनगर परिसरातील आरमोर्स टाउनशिपमध्ये त्यांच्या डुप्लेक्सच्या बाल्कनीमध्ये प्लास्टिक बॉलने क्रिकेट खेळत होते. त्यांचा बॉल शेजारच्या लिंबाच्या झाडावर अडकला. दोघांनी बाल्कनीमध्ये ठेवलेला एल्युमिनियमचा रॉड घेऊन झाडाला हालवून बॉल खाली पाडण्याचा प्रयत्न केला. चिमुकल्यांच्या हातातल्या रॉडचा स्पर्श चुकून त्यांच्या घराला चिटकून जाणाऱ्या हायटेन्शन इलेक्ट्रिक वायरला झाला आणि जोरदार स्फोट झाला.

स्फोट एवढा मोठा होता, की धर कुटुंबियांच्या डुप्लेक्सच्या भिंतीला तडे जाऊन भिंत काळी पडली. स्फोटात दोन्ही भावांना जोरदार वीजेचा शॉक बसला. या घटनेत दोघेही 45 ते 50 टक्के भाजले गेले. तेव्हापासून रुग्णालयात दोघांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. एका मुलाचे हात तर एवढे वाईटरित्या भाजले गेले आहेत की ते निकामी होतील की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

मुळात आरमोर्स टाउनशिप बनली तेव्हाही महावितरणची ही हायटेन्शन लाईन त्या ठिकाणी होती. घराला चिटकून असलेल्या इलेक्ट्रिक वायर संदर्भात नागरिकांनी अनेक वेळेला बिल्डरकडे पाठपुरावा केला. मात्र आजपर्यंत बिल्डरने नेहमीच त्यांची दिशाभूल केली.

निराश झालेल्या नागरिकांनी महावितरणकडे अनेक वेळेला तक्रार केली. यात हायटेन्शन लाईन घरांपासून थोड्या अंतरावर नेण्याची किंवा त्याला इन्सुलेशन पाईप मधून नेण्याची विनंती केली. मात्र, महावितरणनंही आजवर यात लक्ष घातलं नाही. अखेर त्याची किंमत दोन चिमुकल्याना मोजावी लागली आहे.

दरम्यान, या टाऊनशिपमध्ये धोकादायक हायटेन्शन इलेक्ट्रीक वायरचा शॉक बसल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. काही महिन्यांपूर्वी तर एका मजुराचा शॉक लागून मृत्यूही झाला होता. मात्र कोणीही त्याकडे लक्ष देत नाही. धक्कादायक बाब म्हणजे दोन मुलांचा जीव धोक्यात असताना आजवर बिल्डरने विचारणाही केलेली नाही. तर महावितरण आणि महानगरपालिकेपैकी कोणाचाही अधिकारी धर कुटुंबीयांची साधी भेट घ्यायला ही आलेला नाही.

मुळात धोकादायक हायटेन्शन लाईनजवळ बिल्डरने बांधकाम केलंच कसं? महापालिकेने त्या ठिकाणी बांधकामाची परवानगी कशी दिली आणि लोकांच्या विनंतीनंतरही महावितरणने धोकादायक हायटेन्शन लाईन त्या ठिकाणातून हलवण्याची किंवा त्याला इन्सुलेशन पाइपमधुन नेण्याची तसदी का घेतली नाही, असे अनेक प्रश्न या घटनेतून निर्माण झाले आहे.