मुंबई: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना सांगली महापालिकेनं नुकसान भरपाई देण्याचा विचार करावा, अन्यथा आम्हाला तसे आदेश जारी करावे लागतील, असा इशारा मुंबई हायकोर्टाने प्रशासनाला दिला.


सांगलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हा इशारा दिला.

सांगली इथं तीन वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी 5 वर्षीय तेजस हालेचा बळी घेतला होता. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने भटक्या कुत्र्यांना प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजना न केल्याने तेजसचा बळी गेला.  त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून प्रशासनाने 20 लाख रूपये द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका तेजसचे वडील मारुती हाले यांनी अ‍ॅड. पद्मनाभ पिसे यांच्यामार्फत हायकोर्टात केली आहे.

यापूर्वीच्या सुनावणीत हायकोर्टाने निर्बीर्जीकरणाने भटक्या कुत्र्यांचे प्रजनन थांबेल. मात्र त्यांची हिंसक वृत्ती कमी होणार नाही. त्यांना हद्दपार करणेच योग्य ठरेल, असं परखड मत व्यक्त केलं होतं.