सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार 13 ते 16 जुलैला जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. 


संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, मोबाईलचा वापर टाळावा. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी.


आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा व पायी अथवा वाहनाने प्रावास करु नका. घरा बाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्तेवाहतुकीची आणि पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर बोलू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. 


मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्र कक्ष- 02362-228847 किंवा टोल फ्री - 1077 ला संपर्क करावा, तसेच तालुका नियंत्रण कक्ष 



  • दोडामार्ग तालुक्यासाठी - 02363-256518,

  • सावंतवाडी तालुक्यासाठी - 02363-272028, 

  • वेंगुर्ला तालुक्यासाठी - 02366-262053, 

  • कुडाळ तालुक्यासाठी - 02362-222525, 

  • मालवाण तालुक्यासाठी - 02365-252045,

  • कणकवली तालुक्यासाठी -  02367-232025, 

  • देवगड तालुक्यासाठी-  02364-262204, 

  • वैभवाडी तालुक्यासाठी - 02367-237239, या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.


अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते. अशावेळी नागरिकांनी सतर्क रहावे. आपतकालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी आपण रहात असल्यास प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे. पूरप्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे या ठिकाणी आपतकालीन परिस्थितीत उद्भवल्यास त्याबाबत जागरूक रहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी जाऊ नये. अतिवृष्टी होत असताना कोणीही समुद्रात, नदी - नाले इत्यादी ठिकाणी जाऊ नये. अतिवृष्टी कालावधीत रस्ते निसरडे बनल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वाहन चालवताना आवश्यकती काळजी घेण्यात यावी. पुराच्या पाण्यात, समुद्रात नागरिकांनी सेल्फी काढू नये. आपतकालिन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. असे आव्हान जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केलं आहे.