Solapur Rain News Weather : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) थैमान घातलं आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसानं नागरिकांची चांगलीच तारंबळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज सोलापूर (Solapur) शहरासह विविध भागात मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरह मोहोळ, माढा, करमाळा परिसरात चांगलाच अवकाळी पाऊस झाला आहे. दिवसभरात प्रचंड ऊन असताना दुपारी 4 नंतर अचानक वातावरणात बदल झाला. 


उष्णतेपासून नागरिकांना दिलासा 


सोलापूर जिल्ह्यातही वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला आहे. या पावसामुळं हवेत गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला होता. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं नागरिकांच्या अंगाची काहीली होत होती. अशातच आता सोलापूर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 


19 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार 


दरम्यान, हा अवकाळीचा जोर आणखी किती दिवस राहणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (ManikRao Khule) यांनी दिलेल्या माहितनुसार येत्या 19 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण कायम आहे. ही स्थिती 19 मे पर्यंत कायम राहील. 19 मे पासून राज्यात अवकाळी पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 


फळबागांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 


दरम्यान, सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळं अनेक ठिकाणी शेती पिकांना देखील फटका बसलाय. फळबागांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अशात आता पुन्हा 19 तारखेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पॉलिहाऊसचे देखील नुकसान झाले आहे. जोराच्या वादळी वाऱ्यामुळं अनेक नागरिकांच्या घरांचं देखील नुकसान झालं आहे. दरम्यान, काल मुंबईत वादळी वाऱ्या मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी पडझड देखील झाल्याचं पाहायला मिळालं आहे.


महत्वाच्या बातम्या:


अवकाळी पावसाचं थैमान, केळी, मिरची, डाळिंब, ऊस, कांदा पिकांचं नुकसान; 12 जनावरांचा मृत्यू